
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी-कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी कार्यालय, राहाता येथे कार्यरत असलेले पुणतांबा मंडळाचे सहाय्यक कृषि अधिकारी राजेश पऱ्हे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शासकीय सेवा कार्य गौरव पुरस्कार 2025 ने नुकतेच गौरविण्यात आले. हा पुरस्कार ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे प्रदान करण्यात आला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री महादेव मंदिर भक्त परिवाराच्या वतीने जळगाव येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समस्त जळगावकर ग्रामस्थांनी एकत्र येत राजेश पऱ्हे यांचा सन्मान केला. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, गणेश कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी, अण्णासाहेब चौधरी, भाऊसाहेब चौधरी, उपसरपंच दिलीपराव चौधरी, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज ओळेकर, एम.टी. चौधरी, दिलीप चौधरी, अशोक चौधरी, विनायक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेश पऱ्हे हे मागील 11 वर्षांपासून कृषि विभागात कार्यरत असून त्यांनी विविध शासकीय योजना व आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवून प्रभावी अंमलबजावणी केली आहे. जळगाव पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांना त्यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे.
त्यांच्या कार्याबद्दल बोलताना ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी यांनी पऱ्हे यांनी केलेल्या शेतीविषयक मार्गदर्शनाचे कौतुक केले. तर गणेश कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी यांच्या मनोगतात असे नमूद करण्यात आले की, राजेश पऱ्हे हे कर्तुत्वान अधिकारी असून शेतकरी बांधवांची प्रामाणिक सेवा करत असुन त्यांनी केलेल्या शासकीय सेवेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी राजेश पऱ्हे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.




