
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव येथील अष्टविनायक मिल्कचा ७ वा वर्धापन दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने संस्थेशी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना संगमनेर येथील कळस कृषी डेअरी प्रदर्शनास भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी तसेच गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ११ जानेवारी २०१९ रोजी अष्टविनायक मिल्क संस्थेची मुर्तमेढ रोवण्यात आली. अल्पावधीतच संस्थेने जळगावसह परिसरातील समस्त दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला असून संस्थेची वाटचाल सातत्याने प्रगतीपथावर सुरू आहे.

मागील सात वर्षांच्या कार्यकाळात संस्थेने दूध उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी अग्रस्थानी ठेवत दुधाला योग्य दर देत. वेळेवर दूध पेमेंट करण्याचा पायंडा पाडला आहे.दरवर्षी दिवाळीला रिबेट वाटप तसेच शासकीय बँकांच्या माध्यमातून कर्जवाटप केले आहे. सध्या संस्था दररोज सुमारे नऊ हजार लिटर दुधाचे संकलन करत असून हा आकडा संस्थेवरील शेतकऱ्यांचा वाढता विश्वास दर्शवणारा आहे. गोपालन व्यवसाय अधिक फायदेशीर, शाश्वत व आधुनिक पद्धतीने विकसित व्हावा या उद्देशाने संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. वर्धापनदिनाचे औचित्य साधून संगमनेर येथील कळस कृषी डेअरी प्रदर्शनास दूध उत्पादक शेतकऱ्यांना भेट घडवून आणण्यात आली. यातून गोपालनातून अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष माहिती व अनुभव मिळाला.

अष्टविनायक मिल्ककडून राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बँकाच्या माध्यमातून नियमित कर्जवाटप केले जाते.यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मुक्त संचार गोठ्याची निर्मिती केली आहे.यामुळे परिसरातील अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक घडी सावरली आहे.दुध उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या परिवाराचे सदस्य मानून अडचणीच्या काळात संस्थेने त्यांना मोलाचा आधार दिला आहे.मागील सात वर्षांच्या कार्यकाळात संस्थेशी जोडलेला प्रत्येक दूध उत्पादक हा अष्टविनायक मिल्क परिवाराचा अविभाज्य घटक असून अष्टविनायक मिल्क परिवार त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होत असल्याचे मत संस्थेच्या अध्यक्षा सौ.अनिताताई शंकर चौधरी यांनी व्यक्त केले.




