
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना राज्यात सर्वसामान्य, दीनदलित,आदिवासी आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे.या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी कोपरगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयामार्फत सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.शासनाच्या विविध लाभार्थी योजनांना मी पुण्याचे कार्य मानते.एकवेळ मंदिरात जाणे राहिले तरी चालेल,मात्र गोरगरिबांचे अश्रू पुसता आले पाहिजेत. त्यापेक्षा मोठे पुण्याचे दुसरे कोणतेही कार्य असू शकत नाही, असे प्रतिपादन मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
कोपरगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध लाभार्थी योजनांअंतर्गत लाभार्थी संमेलन कार्यक्रमाचे तालुक्यातील कुंभारी येथे गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे शिवाजीराव कदम होते.माजी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, दीपकराव चौधरी, बापूसाहेब धर्मा पवार, ज्ञानेश्वर चिने, भागवत कदम, पंढरीनाथ कदम, नरेंद्र कदम, मारुती कदम, सुरेश चतुर, गजानन कदम, नितीन सांगळे, पोपटराव नीलकंठ, सतीश घुले, भगवान खळे, बाबासाहेब जाधव, नानासाहेब थोरात, गोपीनाथ निळकंठ, सोपानराव चिने, चेअरमन विजयराव दगडू कदम, पश्चिम मंडल अध्यक्ष सुनिल कदम, युवा मोर्चा अध्यक्ष अमोल गवळी, भाजप शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे, उपाध्यक्ष सतीश देवकर, कच्चेश्वर माळी, रामराव मोरे, महिला संचालिका विमलताई सोपानराव चिने तसेच समस्त ग्रामस्थ, कुंभारी येथील नागरिक आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना मा. आ. स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयात जावे लागते.मात्र अनेकदा तेथे गेल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परिणामी नागरिकांची कामे रखडतात आणि त्यांना अनेक हेलपाटे मारावे लागतात.तहसील कार्यालयातील एक अनुभव सांगताना त्यांनी नमूद केले की, एकदा कामानिमित्त कोपरगाव तहसील कार्यालयात गेले असता ७० ते ८० वयोगटातील काही ज्येष्ठ महिला भगिनी भेटल्या. त्या वारंवार तहसील कार्यालयात येऊनही त्यांची कामे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्या दोन्ही महिलांना सोबत घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन तात्काळ त्यांच्या कामांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी त्या दोन्ही मायमाऊलींच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. आजही अनेक सरकारी योजना अस्तित्वात असल्या तरी त्यांचा लाभ अनेक गरजूंपर्यंत पोहोचत नाही. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गावोगावी शिबिरांचे आयोजन करून लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोपरगाव तालुक्यात रेशन कार्ड वितरणाचे कार्यक्रम घेण्यात आले. अनेक गरजवंतांना रेशन कार्ड मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि भावनिक क्षण अनुभवण्याची संधी मला मिळाली, असे त्या म्हणाल्या.
या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकदा अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसणे, कागदपत्रांची पूर्तता न होणे, अतिरिक्त पैशांची मागणी होणे अशा अनेक अडचणींना गोरगरिबांना सामोरे जावे लागते. स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांसोबत येथील अनेकांनी काम केले आहे. आदिवासी बांधवांना त्यांच्या जमिनींचे हक्क मिळवून देणे, समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देणे तसेच लाभार्थी योजना जनतेपर्यंत पोहोचविणे अशी असंख्य जनहिताची कामे त्यांनी केली.स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत अंगीकारले होते.आमच्या सह सर्व कार्यकर्त्यांमध्ये हे व्रत रुजवलेले आहे.जनतेची केलेली सेवा कधीही वाया जाणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे.जनतेच्या सेवेसाठी कोल्हे परिवार कायम उपलब्ध आहे.शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सबका साथ, सबका विकास, ‘सबका विश्वास सबका प्रयास’ हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना दरमहा हक्काची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. ही योजना राज्यात अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रत्येकाला स्वतःचे घर मिळावे यासाठी घरकुल योजनासह शासनाकडुन अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीब जनतेची स्वप्ने पूर्णत्वास यावीत, हाच शासनाचा मूलभूत हेतू असून शासनाचे कार्य पूर्ण करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते नेहमी प्रयत्नशील असतात असे मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.
आमदार विवेकभैय्या कोल्हे आज विधान परिषदेमध्ये राज्यातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून ते सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. जनतेच्या हक्कासाठी लढणारा आपला माणूस आज विधान परिषदेमध्ये उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांवर विश्वास ठेवून त्यांचा लाभ घ्यावा.शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी मीही कायम आपल्या सोबत राहून त्या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करत राहणार आहे.
– मा.आ.स्नेहलताताई कोल्हे.




