
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – श्रीरामपूर तालुक्यातील वडाळामहादेव ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली स्नेहालय उडान प्रकल्पाच्या पुढाकाराने आणि ‘माझं गाव, बालविवाहमुक्त गाव’ या अभियानांतर्गत सरपंच चंद्रकला पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत ग्राम बाल संरक्षण समिती आणि आदिशक्ती अभियान समिती यांची एकमताने स्थापना करण्यात आली. यादोन्ही समित्या गावातील बालविवाह प्रतिबंध, महिला सक्षमीकरण व बाल संरक्षणाच्या दृष्टीने कार्यरत राहणार असून बालविवाह प्रतिबंधक ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
ग्रामसभा प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी नंदकिशोर शेळके, उपसरपंच अलका लोंढे, सदस्य दादासाहेब झिंज, सचिन पवार, कृष्णा पवार, भरत पवार, सविता उघडे, अविनाश पवार, लिपिक शिवाजी चौधरी, कर्मचारी माधव तेलोरे, मच्छिन्द्र भोंडगे, ग्रामस्थ अशोक कुसळकर, सर्व अंगणवाडी व आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, उमेद अभियानाच्या महिला कार्यकर्त्या आणि गावातील ३५० हून अधिक महिलांचा मोठा सहभाग होता. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी नंदकिशोर शेळके यांनी महिलांसाठी आयोजित विशेष ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून माहिती दिली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्नेहालय उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी बालविवाह कायदा, त्याचे दुष्परिणाम, मानसिक व सामाजिक अडचणी, महिलांच्या अडचणी आणि त्यावरील उपाय योजनांवर सखोल मार्गदर्शन केले. “महिला आणि पालक सक्षमीकरण हीच बालविवाह थांबवण्याची खरी गुरुकिल्ली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. संविधानातील मूलभूत हक्कांविषयी जागरूकता निर्माण करत सामाजिक प्रश्नांविषयी प्रभावी भूमिका मांडली.
या अभियानासाठी स्नेहालय उडान प्रकल्पातील सोशल वर्कर्स शाहिद शेख, प्रवीण दरंदले, शुभम डहारे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाला महिलांनी ठोस पाठिंबा दर्शवला असून, गावात कोठेही बालविवाह अथवा बालकांवर अत्याचार होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ ग्राम बाल संरक्षण समितीला माहिती देण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागातून ग्रामसभेत पारित झालेला ठराव गावाच्या सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरली आहे.
