(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडून तत्काळ राजीनामा घेण्यात यावा,अशी मागणी एका पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, “पाशा पटेल हे माझे जुने सहकारी असून 1990 साली आम्ही शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारभूत किंमत मिळावी, उस- कापूस दर वाढावा, कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी नाशिक येथे रस्तारोको आंदोलनात पाच दिवस जेलमध्ये होतो. त्यावेळी पाशा पटेल आमच्यासोबत होते.”
विठ्ठलराव शेळके यांनी पुढे नमूद केले की, “भाषणशैली प्रभावी असल्यामुळे त्यांना नांदेड येथे झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत मीच प्रदेशाध्यक्षपदासाठी सुचवले होते. शरद जोशी यांच्यासह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाला मान्यता दिली. मात्र पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०१३ साली नागपूरहून भाजपप्रणीत शेतकरी दिंडी काढली. त्यामध्ये सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होते. सोयाबीनला ६५०० आणि कापसाला ८५०० रुपये दर मिळावा, अशी मागणी होती. पण सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे हित विसरले.”
“पाशा पटेल यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाल्यावर कधीही शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारभूत किंमत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे ठाम भूमिका घेतली नाही. उलट चुकीचा उत्पादन खर्च दाखवून शेतकऱ्यांना फसवले. त्यामुळे त्यांनी हे पद तत्काळ सोडावे,” असे शेळके म्हणाले.
त्याचप्रमाणे, त्यांनी शेतकरी संघटनेचे आणखी एक माजी नेते आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचाही निषेध केला. “सत्तेत गेल्यावर त्यांनीही शेतकरीविरोधी धोरण स्वीकारले. दोघांनीही शेतकरी संघटनेचा वापर सत्तेसाठी केला व सत्तेवर गेल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न मागे टाकले,” असा आरोप विठ्ठलराव शेळके यांनी केला.
“शेतकरी आत्महत्या करत असताना, कर्जमुक्तीसाठी आंदोलन करणाऱ्यांना विरोध करणारे हे गद्दार सहकारी आज शेतकरी विरोधी भूमिका घेत आहेत. अशा नेत्यांचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो,” असे शेवटी शेळके यांनी पत्रकात म्हटले आहे.
