
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील चितळी स्टेशनवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था सध्या अत्यंत धोकादायक बनली आहे. १ ली ते ४ थी या वर्गांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ११० हून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. शाळेच्या छतावरील पत्रे पूर्णपणे कुजले असून,भिंतींमधून पाणी झिरपत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती पालक आणि ग्रामस्थांमध्ये आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अतुल चौधरी यांच्या सह चितळी परिसरातील ग्रामस्थांनी व पालकांनी मोठी चिंता व्यक्त केली असून या दुरावस्थेबाबत गावातील अनेक सुज्ञ नागरिकांनी पाठपुरावा करून समस्त ग्रामस्थांना आवाहन केल्यानंतर जवळपास १५ ते २० हजार रुपयांचा निधी गोळा करण्यात आला आहे.तरी अद्यापही जिल्हा परिषदेकडून ना निधी मिळाला,ना पाहणीसाठी अधिकारी आले आहेत.हे दुर्दैव आहे.
या प्रकाराची दखल घेवून ग्रामस्थ आणि पालक स्वखर्चातून दुरुस्ती करण्याच्या प्रयत्नात असताना प्रशासन मात्र शांत आहे. त्यामुळे “प्रशासन कोठेतरी कमी पडत आहे का?” असा प्रश्न आता जोराने विचारला जात आहे. १५–२० वर्षांपूर्वी उभारलेली ही इमारत आता जीर्ण झाली असून, पावसाचा जोर पाहता स्लॅब आणि पत्रे कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही परिस्थिती डागडुजीपुरती मर्यादित न ठेवता नवीन इमारतीची मंजुरी देणे ही काळाची गरज बनली आहे.
चितळी परिसरातील नागरिक व पालक वर्गाने संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ इमारतीची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताला कोणतीही हानी झाल्यास जबाबदारी कुणाची, असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. ग्रामस्थांनी शाळेप्रती दाखवलेली बांधिलकी प्रशासनासाठी एक जागृतीचा इशारा ठरावा.
