
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोल्हार – गावच्या विकासात प्रत्येकानेच हातभार लावण्याची गरज आहे. विकास काम चांगल्या दर्जाची आणि लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
राहुरी तालुक्यातील पिंपळगांव फुणगी येथील ग्राम सचिवालयाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिव लोखंडे होते.यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक दत्ता पाटील शिरसाठ,प्रा.सतीष राऊत,राहुरी बाजार समितीचे माजी संचालक वसंतराव कोळसे,कारभारी नान्नोर, पंचायत समितीचे एस. एस. तायडे, उपविभागीय अभियंता एस. एस. घोरपडे सरपंच शिवाजी जाधव, उपसरपंच सुनीता जाधव, संभाजी नान्नोर, विशाल नान्नोर, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ. विखे पाटील म्हणाल्या, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध होत आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर प्रेम करणारे गाव आहे याची आठवण करून देत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आदर्श काम होत असून विकास काम करताना गावाला पुरस्कार कसा मिळेल असे प्रयत्न करण्याचे त्यांनी सूचित केले.
गावामध्ये सुरू असलेल्या बचत गटांनी व्यवसायातून आपली वेगळी ओळख निर्माण करावी महिलांनी एकमेकींना समजून घेत बचत गटाच्या चळवळीतून पुढे जावे. एखादी वास्तू उभी कराण्याच्या अगोदर अवती भोवतीअसलेल्या इतर वास्तुची पाहणी करून आपण त्या पद्धतीने वास्तू निर्माण करावी जेणेकरून ती दीर्घकाळापर्यंत आणि भविष्याचा वेध घेऊन ती गावच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल.यासाठी कोल्हार खुर्दची ग्रामसचिवालय हे आदर्श असल्याचे सांगितले.
माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या गावाने मला दोनदा खासदार केले जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खा. डॉ सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून आहिल्या नगरचा सर्वांगीण विकास होत आहे हा विकास होत असताना मला खासदार करण्यामध्ये त्यांचा वाटा हा महत्त्वाचा राहिला आहे सर्वांना न्याय देण्याचे काम आपण आपल्या पदाच्या माध्यमातून केले आहे. भेदभाव विसरून सर्वांनी एकत्र काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी प्रास्ताविकातून प्रा.सतीष राऊत यांनी मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचा आढावा घेत पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणींना या निमित्ताने उजाळा दिला. हिरकणी महिला बचत गटाच्या सुरेखा वडीतके यांनी मनोगत व्यक्त करताना आमच्या बचत गटांसाठी ग्रामपंचायतची जुनी इमारत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
