
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव येथे सोमवारी शाळा पूर्वतयारी मेळावा,इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक गोरक्षनाथ चौधरी होते. शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.यावेळी लहानु चौधरी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वाघ, सदस्य बाळासाहेब चौधरी, बाबासाहेब चौधरी, विजय चौधरी, डॉ. गोरक्षनाथ चौधरी,अरुण गायकवाड, मंजुषा शिंदे, आरती वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.श्री.अष्टविनायक मिल्कच्या वतीने वतीने सर्व विद्यार्थ्यांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे मा. अध्यक्ष बाबासाहेब चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना जळगाव शाळेचा अभिमान व्यक्त केला. येथील विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये अव्वल येत सातत्याने प्रगती करत असून, शिस्तीच्या बाबतीत जळगाव शाळेचा डंका आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून शिक्षकांच्या मार्गदर्शनातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे.
शालेय जीवनात ‘वन्समोर’ नसतो,त्यामुळे सातत्याने अभ्यास करणे गरजेचे असून स्पर्धेत उतरणे ही काळाची गरज आहे.थोडेफार संगोपन स्वतःमध्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेले गुणवत्तेचे प्रतीक भविष्यात जि.प. शाळा वाचविण्यासाठी सर्वात मोठे पाऊल ठरणार आहे. शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानातून सर्वांनी चमकावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी डॉ. गोरक्षनाथ चौधरी, बाळासाहेब चौधरी तसेच चितळी शाळेचे शिक्षक बर्डे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी मुख्याध्यापक नारायण जाधव म्हणाले,शाळेच्या गुणवत्तेवर सातत्याने भर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गावकऱ्यांच्या व शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्यामुळेच शाळेची प्रगती होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या प्रसंगी शाळेचे शिक्षक ठकाजी खेमनर, मारुती खरात, मंगल भडांगे यांच्यासह सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना चितळी महाविद्यालयात पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत निरोप देण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना गोड भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती खरात यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नारायण जाधव यांनी मानले.फोटोग्राफर मच्छिंद्र गलांडे यांनी विद्यार्थ्यांना फेटे बांधण्यासाठी सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.




