
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – चितळी (ता. राहाता) येथील रहिवासी ऋषिकेश सुनील नळे यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून गेट 2025 च्या संगणक विज्ञान शाखेत कॉम्प्युटर सायन्स अखिल भारतीय स्तरावर 1121वा क्रमांक पटकावला असून त्यांचा गेट स्कोर 711 आहे. हा अपूर्व यशाचा टप्पा गाठत त्यांनी गावाचे आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.चितळी (ता. राहाता) येथील महा ई सेवा केंद्राचे संचालक अनिल उत्तमराव नळे यांचा तो पुतण्या आहे.
ऋषिकेश सध्या MIT ADT University, पुणे येथे संगणक अभियांत्रिकी (CSE) मध्ये बी.टेक. शिक्षण घेत आहेत. लहानपणापासूनच तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञानामध्ये विशेष रुची असलेल्या ऋषिकेशने जिद्द, मेहनत आणि अचूक नियोजनाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. भविष्यात IIT सारख्या सर्वोत्तम शिक्षणसंस्थेत M.Tech करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या या यशामुळे नळे परिवाराचे सर्वस्थरावर कौतुक केले जात आहे.
भारतातील सर्वांत प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE) ही परीक्षा भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात कठीण आणि जगातील आठवी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना IITs, NITs यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये M.Tech, Ph.D. तसेच विविध सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (PSUs) उच्चपदस्थ नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.गेट परीक्षेतील हे यश मिळवण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता, सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. गेट ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे अभियांत्रिकीतील उच्च प्रतिभेचे प्रमाणपत्र मानले जाते. ऋषिकेशच्या या उल्लेखनीय यशामुळे चितळी गावाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे.
