
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
अहिल्यानगर – जलजीवनच्या योजनांमुळे आता रणकंदन सुरू झाले आहे. गावागावांत आपसांत सुरू असलेली सुंदोपसुंदी आता थेट जिल्हा परिषदेत पोहोचली आहे. आज एका ठेकेदाराने एका ग्रामपंचायत सदस्याला झोडून काढले. तोही धावून गेला. मात्र, अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला हा प्रकार शुक्रवारी (ता.२४) रोजी जिल्हा परिषद अहिल्यानगर याठिकाणी घडला.
एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या नादात गावोगावच्या योजना रखडल्या आहेत. आज या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागात बैठक बोलावली होती. त्यात हा राडा झाला. पारनेर तालुक्यातील जलजीवन योजनेच्या अपूर्ण कामाच्या आढावा बैठकीत ठेकेदार-माजी सरपंचात ही हाणामारी झाली, माजी सरपंचाने तक्रार केल्याने चिडलेल्या ठेकेदाराने ग्रामपंचायत सदस्याच्या थेट कानाखाली ठेवून दिली. अचानक घडलेल्या प्रकाराने कोणालाच काही सुचेना. नंतर त्या माजी सरपंचानेही रौद्ररूप धारण केले. तोही खुर्ची घेऊन ठेकेदाराला मारण्यासाठी धावला.
दरम्यान, या घटनेनंतर पाणी पुरवठा विभागाने घडलेल्या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले. बैठकीत काही लोकांमध्ये वादावादी झाली. मात्र, वाद घालणारे ते कोण आहेत होते, माहिती नसल्याचे सांगत घडलेल्या प्रकारापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला.योजनेतील कामाचा आढावा घेण्यासाठी, रखडलेली तातडीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, पारनेर पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग यांनी नगरला जिल्हा परिषदेचे मुख्यालयात शुक्रवारी दुपारी आढावा बैठक घेतली.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एच. बी. चव्हाण यांच्यासह तालुका पातळीवरील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, जलजीवन पाणी योजना अपूर्ण असणाऱ्या गावातील सरपंच यांच्यासह ठेकेदार उपस्थित होते. बैठकीत सुरू होता. यावेळी संबंधित गावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आणि पाणी योजनेचा ठेका घेतलेला ठेकेदार आणि त्यांचे सहकारी हजर होते.
बैठकीत संबंधित गावातील जलजीवन पाणी योजनेचा आढावा सुरू असताना ठेकेदार आणि संबंधित ग्रामपंचायत सदस्य यांच्या अपूर्ण कामावरून हमरी-तुमरी झाली. एकमेकांनी पाणी योजना अपूर्ण असल्याचे कारण पुढे केले. सुरुवातीला खडाखडी सुरू होती. नंतर त्या चर्चेने रौद्र रूप धारण केले. संतापलेल्या ठेकेदाराने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याच्या श्रीमुख लाल केले. बैठकीत घडलेला प्रकार अनपेक्षित असल्याने सुरुवातीला कायझाले हे कोणालाच समजले नाही.
मात्र, प्रकरण हातघाईवर आल्याचे पाहताच अधिकारीही थरथरले. बैठकीत हजर असणाऱ्यांपैकी काहींनी पुढे होत ठेकेदार आणि सदस्य यांना बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांनी एकमेकांच्या डोक्यात खुर्ची घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे गडबडलेल्या अधिकाऱ्यांनी बैठक आवरती घेतली. काही वेळाने तणाव निवळ्यानंतर सर्वजण निघून गेले. दरम्यान याबाबत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाशी संपर्क केला असता, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाशी या वादाचा संबंध नाही. संबंधित गावात असणाऱ्या वादाचे पडसाद बैठकीत उमटले, असे सांगत हात झटकले.
पारनेर तालुक्यातील एका गावाच्या जलजीवन योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात तालुक्यातील सरपंच आणि ठेकेदार यांची बैठक बोलवली होती. यावेळी अपूर्ण कामावरून काही लोकांमध्ये वाद झाले. वाद घालणारे कोण होते, हे मी ओळखत नाही. झालेला वाद हा आपसातील असण्याची शक्यता आहे. – एच. बी.चव्हाण,
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, अहिल्यानगर,
