
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
अहिल्यानगर – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सडे, ता. राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी स्नेहालय उडान प्रकल्पाने “बालविवाहाची समस्या आणि तरुणाईची भूमिका” या विषयावर जागृती सत्राचे आयोजन केले.
या सत्रात स्नेहालय उडान प्रकल्पाच्या कार्याची सखोल माहिती देताना, प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, उडान प्रकल्पाचे मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर, आणि स्नेहालय संस्थेचे संचालक श्री हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हा २०२७ पर्यंत बालविवाह मुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी ध्येय घेतल्याची माहिती दिली.
उडान प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यात जनजागृती करून बालविवाह प्रतिबंध करण्याचे काम करत आहे. यामध्ये पीडित मुलींची सुटका करून त्यांचे पुनर्वसन करण्यावर जोर दिला जात आहे. त्यांचे आरोग्य सुदृढ करणं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी काम सुरू आहे. या कार्याची गती वाढवण्यासाठी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना कार्यशाळा, सहली आणि जनजागृती सत्रांद्वारे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रविण कदम यांनी सांगितले की, “स्नेहालय संस्थेचे कार्य 27 विविध प्रकल्पांमध्ये विभागले गेले आहे, ज्यात सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्य सुरू आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी हे काम प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी सहली आयोजित करून त्याबद्दल अधिक माहिती घेणे आणि आपल्या जीवनात आनंदी आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी हे कार्य समजून घेणे महत्त्वाचे आहे.
स्नेहालय उडान प्रकल्पाच्या मार्गदर्शनात बालविवाह, बालकांचे अधिकार, बालविवाहाचे दुष्परिणाम, सोशल मीडिया आणि मोबाईलच्या दुरुपयोगाचे परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी, अनिकेत बेलेकर आणि प्रशांत खुंटेकर यांनी जागृती चळवळीतील गीते सादर केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण झाली आणि एकजुटीची भावना जागृत झाली.कार्यक्रमात २५० शाळेचे विद्यार्थी आणि ९० राष्ट्रीय सेवा योजनेचे तरुण-तरुणी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल गायकवाड, डॉ. दत्तात्रय खिलारी, डॉ. योगिता मोरे, डॉ. पवार मॅडम, तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक आणि इतर मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले.
स्नेहालय उडान प्रकल्पाने बालविवाह मुक्त आणि समाजातील सर्वांना स्वावलंबी बनवण्यासाठी कार्य सुरू केले आहे. शाळा आणि महाविद्यालयांनी यामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. यासाठी सहलींचे आयोजन करणे आणि समाजातील सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.जागृती सत्रामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये बालविवाहाचे दुष्परिणाम, त्याच्या प्रतिबंधाची आवश्यकता आणि समाजातील सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी संकल्प घेतला, आणि समाजाच्या भल्यासाठी योगदान देण्याची जबाबदारी घेतली.
“स्नेहालय उडान प्रकल्पाने अहिल्यानगर जिल्ह्यात बालविवाह मुक्त करण्यासाठी केलेली कार्यवाही भविष्यकाळात मोठा परिणाम घडवेल. प्रत्येक शिक्षण संस्था, विद्यार्थी आणि नागरिकांनी या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत सक्रिय सहभागी होऊन स्नेहालयच्या कार्याला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
