
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
पारनेर – स्नेहालय संचालित ‘उडान प्रकल्प’ आणि पारनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझे गाव बालविवाहमुक्त गाव’ आणि ‘माझी शाळा बालविवाहमुक्त शाळा’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. बालकांचे हक्क, शिक्षण व स्वावलंबन सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत असलेली स्नेहालय संस्था गेल्या पाच वर्षांपासून शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन क्षेत्रात प्रभावी कार्य करत आहे. बालविवाह प्रतिबंध, मुलींचे पुनर्वसन आणि बाल सुरक्षा या बाबींवर विशेष भर देत संस्था अधिकारी-शिक्षकांचे प्रशिक्षण, गावपातळीवर समित्यांची स्थापना आणि स्थानिक सहभागाद्वारे सातत्याने काम करत आहे.
पारनेर तालुक्यातील गटविकास अधिकारी दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या. यावेळी स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम, शशिकांत शिंदे, पत्रकार भगवान गायकवाड यांची उपस्थिती होती. बैठकीत बाल संरक्षण समित्या स्थापन करणे, शाळाबाह्य व अपठित मुलींना शिक्षणात आणणे, सखी-सावित्री समित्या अधिक प्रभावी बनवणे, विवाह लावणाऱ्या घटकांमध्ये जागृती करणे, स्थानिक यंत्रणांचा सहभाग वाढवणे यावर सविस्तर चर्चा झाली.
या अभियानाच्या माध्यमातून अशा कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे जिथे बालविवाहाची शक्यता असते. अशा प्रकरणांमध्ये प्रशासन व सामाजिक संस्थांच्या मदतीने मुलींच्या भविष्यासाठी योग्य योजना राबवण्याचा निर्धार करण्यात आला. प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी यामागची भूमिका स्पष्ट करत उपस्थित ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी दया पवार यांनी “पारनेर तालुक्यातूनच जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा मार्ग निघेल,” असा विश्वास व्यक्त करत अभियानाची अधिकृत घोषणा केली.
स्नेहालय संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, उडान प्रकल्पाच्या मा. संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर आणि संचालक हनिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे. यामध्ये बालविवाह प्रतिबंधक व्याख्याने, पदयात्रा व सायकल यात्रा, पथनाट्य, स्पर्धा, जनजागृती, सोशल मीडियाचा वापर, कौशल्य विकास केंद्र, शाळाबाह्य मुलींचे सर्वेक्षण व शिक्षणात समावेश, महिला बचत गटांचा सहभाग आणि संकटग्रस्त बालकांसाठी हेल्पलाइन निर्माण यासारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांच्या नेतृत्वाखाली शाहिद शेख, पूजा दहातोंडे, शशिकांत शिंदे, सीमा जुनी, योगेश अब्दुल्ले, प्रवीण दरंदले, शुभम डहारे, पूजा डाकुआ, निशा वाघ, मयूर ठोंबे हे अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
