
( अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क
लोणी – प्राध्यापक संशोधक आणि विद्यार्थ्यांमधील संशोधनाच्या नवसंकल्पना स्टार्ट अप मधील योगदानासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत.सर्वच क्षेत्रात स्टार्टअपची होणारी निर्मिती राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोधनिबंध परिषद आणि स्टार्टअप इनोव्हेशन परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे.दोन दिवसांच्या परीषदेचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दूरदृष्य प्रणाली द्वारे झाले.सर विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डाॅ. विद्याशंकर एस., महाराष्ट्र शासनाच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग टेक्नॉलॉजीकल यूनिवर्सिटी पुणेचे कुलगुरू डाॅ.सुनिल भिरुड, महात्मा गांधी मिशन या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डाॅ. विलास सपकाळ, आऊटस्टँडिंग सायंटिस्ट डाॅ.आर.एस. शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुस्मिता विखे पाटील, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे,संस्थेचे संचालक शिवाजी जोंधळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, परिषदेचे समन्वयक डॉ. संजय कुरकुटे आदींसह विविध महाविद्यालयाचे प्रतिनिधी परीषदेत सहभागी झाले आहेत.
परीषदेतील प्रतिनिधीशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, विकसित भारत ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून पुढे जात आहे. देशांमध्ये आणि विशेषता राज्यांमध्ये इनोव्हेशन आणि स्टार्टअप च्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत उभा राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. या परिषदेच्या माध्यमातून सादर होणारे विविध शोध निबंध, पेटंट,नवकल्पना या राज्याला दिशादर्शक ठरतील.
डॉ. विद्याशंकर एस यांनी सहकार शिक्षण,ग्रामीण क्षेत्रात प्रवरेचे काम हे महत्त्वपूर्ण आहे. प्रवरा प्रिझमच्या माध्यमातून देखील प्रवरेने चांगले काम निर्माण केले आहे. यामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. परिषदेच्या माध्यमातून होणारे संशोधन हे देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करत असतानाच आज अमेरिका ही संशोधन क्षेत्रात आघाडीवर असली तरी भारतही संशोधन क्षेत्रात आघाडीवर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रदान करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मेक इन इंडिया यावरती विशेष काम संशोधकांनी करावे आत्मनिर्भर भारतासाठी लोकल टू ग्लोबल. लोकल टू इनोव्हेशन टेक्नॉलॉजी, ए.आय . तंत्रज्ञान सॉफ्टवेअर टूल्स यावरती विशेष काम होण्याची गरज आहे. ग्रीन आणि डिजिटल इंडिया या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्वप्न बघावे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती देत भारताला पुढे जाण्याची गरज आहे आज अमेरिकेमध्ये ७५ टक्के संशोधन होत असले तरी त्या संशोधनांमध्ये भारताचा वाटा हा महत्त्वपूर्ण आहे आज प्रवरेचे हजारो विद्यार्थी हे अमेरिकेत कार्यरत आहेत या विद्यार्थ्यांना देशा अंतर्गत संशोधन कार्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे गरज त्यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुस्मिता विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासोबतच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र कार्यरत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, ग्रामीण कारागीर आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकाला वेगवेगळे प्रशिक्षण देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे होत आहे.नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे विद्यार्थी घडवण्यावरती संस्थेचा भर असल्याचे त्यांनी सांगत सहकाराच्या माध्यमातून या ठिकाणी उभ्या राहिलेल्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी केले तर या परिषदेचा उद्देश परिषदेचे समन्वयक डॉ. संजय कुरकुटे यांनी विशद केला. दोन दिवसीय परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर साॅप्टवेअर, हार्डवेअर कोर इंजिनिअरिंग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच मल्टी डिसिप्लिनरी मध्ये मेडिकल टेक्नॉलॉजी फार्मसी बायोटेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी अशा विविध प्रकारच्या संशोधन, शोधनिबंध सादर होणार आहेत.
