
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव –“सुनो गोरसे दुनियावालो… बुरी नजर ना हम पे डालो… सबसे आगे होंगे हिंदुस्तानी!” या गाण्यांच्या तालावर, हातात तिरंगा ध्वज व पेटलेल्या मशाली घेऊन सजवलेल्या जीपमधून भारत मातेची जिवंत प्रतिकृती सादर करत कोपरगावमध्ये एक आगळीवेगळी तिरंगा मशाल रॅली आयोजित करण्यात आली. समता पतसंस्थेच्या वतीने 260 फूट लांबीचा भारतमातेचा ध्वज कर्मचाऱ्यांनी हातात घेत रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरला.
सायंकाळच्या प्रसन्न प्रभेत शिस्तबद्ध रीतीने सहभागी झालेल्या तरुण-तरुणी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि हजारो राष्ट्रप्रेमी कोपरगावकरांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “जय जवान जय किसान” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण कोपरगाव देशभक्तीच्या रंगात न्हावून निघाले.
ही भव्य तिरंगा मशाल रॅली कोपरगावकरांनी भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांसाठी प्रेरणा म्हणून व शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केली होती. सर्व जाती, धर्म, पंथ, आणि पक्ष बाजूला ठेवून सैनिकांच्या मनोबलासाठी हा ‘ऊर्जा दिवस’ साजरा करण्यात आला.
रॅलीच्या प्रारंभी भारतमातेचे पूजन वीर पत्नी सौ. सरला ताई जाधव व मंगलाताई वलटे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षा सौ. सुधा भाभी ठोळे यांनी “ए मेरे वतन के लोगो” हे हृदयस्पर्शी गीत सादर करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.या प्रसंगी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे, समता पतसंस्थेचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, कैलासचंद्र ठोळे, पराग संधान, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, सुहासिनी कोयटे, विमल पुंडे, वंदना चिकटे, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही भव्य रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू होऊन विघ्नेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, महात्मा गांधी चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, डॉ. सी एम मेहता कन्या विद्यालय रोड, एस. जी. विद्यालय चौक, श्रीराम मंदिर रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक आणि धारणगाव रोड मार्गे परत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पोहोचली.तेथे सामूहिक राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप करण्यात आला.या रॅलीत माजी सैनिक, सैनिकी संघटना, विविध शाळांचे विद्यार्थी, महिला भगिनी, व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, शिक्षक, पोलिस अधिकारी, वकील आणि असंख्य राष्ट्रप्रेमींनी सहभाग घेत भारतमातेप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.
