
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील पुणतांबा ते वाकडी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील रामपूरवाडी गावाजवळ असलेल्या पुलावर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मध्यभागी मोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, कोपरगाव यांनी गेल्या ३३ वर्षांपासून या पुलाचे काम प्रलंबित ठेवले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या समस्येकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर हे खड्डे जीवघेणे ठरू शकतात. यासंदर्भात लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात येणार आहे. निवेदन देवूनही मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांसह ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात येईल आणि जमा झालेल्या निधीतून रामपूरवाडी पुलाचे काम ग्रामस्थच हाती घेतील,असा ठाम इशारा सरपंच संदीप सुरडकर यांनी दिला आहे.
पुणतांबा मार्गे रामपूरवाडी-वाकडी मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. हा रस्ता राहाता तालुक्यातील अनेक प्रमुख गावांना जोडतो. या मार्गावर १९९२–९४ दरम्यान बांधलेला जुना पूल आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पुलावरील खड्डे वाहनचालकांसाठी धोका निर्माण करत आहेत. दुचाकी व चारचाकी चालकांना जीव धोक्यात घालून खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे.
या भागात २०२१ मध्ये रामपूरवाडी फाट्यापासून गावापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर पुलाचे काम हाती घेतले गेले असते, तर आज ही स्थिती निर्माण झाली नसती. मात्र पुलाचे काम अद्याप रखडलेलेच आहे. दिवसेंदिवस पुलाची अवस्था बिकट होत असून अलीकडेच पुलाला मोठे भगदाड पडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या अडचणीकडे लक्ष देऊन नव्याने पुलाचे बांधकाम करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली. या मागणीला आता अधिक तीव्र स्वरूप येत असून विभागाने तात्काळ दखल घेणे गरजेचे झाले आहे.
