
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – “दुध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून, गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ₹५० आणि म्हशीच्या दुधाला ₹८० दर द्यावा,” अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात शेळके यांनी नमूद केले आहे की, मागील वर्षी दुध दरवाढीसाठी राज्यभर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते. त्यावेळी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केवळ प्रतिलिटर ₹५ अनुदान जाहीर केले होते. त्यातील काही महिन्यांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असले, तरी अनेक महिन्यांचे अनुदान रखडलेले आहे. शासनाकडे निधी नसल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी हात झटकले आहेत.
शेळके पुढे म्हणाले की, “आज आम्हाला अनुदान नको. उत्पादन खर्च लक्षात घेता दूध दर मिळाला पाहिजे. पशुखाद्य, औषधे, मजुरी, चाऱ्याचे दर भरमसाठ वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांत दुधाला कुठलाही दरवाढ न झाल्याने उत्पादक संकटात सापडले आहेत. पूर्वी लाख रुपयांना विकली जाणारी गाय आज ₹३०–₹४० हजारांमध्ये विकली जात आहे.”
राज्यात मोठ्या प्रमाणावर दुध व्यवसाय बंद केला जात असून, याचे प्रमुख कारण म्हणजे भेसळयुक्त दुधामुळे खरा तुटवडा लक्षात येत नाही. मात्र, प्रत्यक्षात अनेक संस्थांकडून दुध पुरवठा घटला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने चौकशी सुरू केली आहे, परिणामी अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
शहरी भागात दररोज शुद्ध दूध पोचवणारे हेच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेळके यांनी शेवटी सांगितले की, “शेतकऱ्यांना भीक नको. दूध आणि शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाल्यास आम्ही टिकू. सरकारला वाटते की विरोधी पक्ष दुर्बळ आहेत, मात्र जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन उभं करण्याची तयारी आम्ही केली आहे.”
