
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – प्रवरेत सुरू झालेल्या शैक्षणिक संकुलामुळे सामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची मुले आज उच्च पातळीवर पोहोचले आहेत. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल करत आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा शैक्षणिक संकुल हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे माहेरघर बनले आहे. असे प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक मच्छिंद्र पावडे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील चणेगांव येथील श्री रामेश्वर विद्यालयातील दहावीतील गुणवंत विद्यार्ध्याच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. विद्यालयामध्ये गुणानुक्रमे कु. पुजा कैलास बढे हिने प्रथम , देव अविनाश लोहाळे द्वितीय तर आरती शरद माळी तृतीय क्रमांक पटकवला. यावेळी दाढ खुर्द येथील ज्येष्ठ मार्गदर्शक नारायण कहार, विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक ह.भ.प.शांताराम महाराज जोरी, बाजीराव खेमनर, राजेंद्र खेमनर, माजी प्राचार्य भास्करराव पाटोळे,सोपानराव पा गुळवे रामनाथ ढमक, अण्णासाहेब गुळवे, सेवानिवृत्त गुळवे साहेब, इंद्रभान ढमक, प्रा. बबनराव शेरमाळे , लक्ष्मण लोहाळे, अविनाश लोहाळे, सौ मंगलताई लोहाळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ अनिल लोखंडे,अतुल मुंतोडे , एस. के. गायकवाड, एस पी. तुपे , पालक व ग्रामस्थ , माजी विदयार्थी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मच्छिंद्र पावडे यांनी शाळेच्या शिक्षकांनी घेतलेले कष्ट, मुलांच्या मेहनतीचे कौतुक केले. स्वर्गीय पद्मश्री विखे पाटील आणि पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागात विद्यालये सुरू करून गोरगरीबांच्या ,कष्टकरी, शेतकऱ्यांच्या मुला-मुलींनी शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे व स्वतःच्या पायावर उभं राहावे, हे त्यांनी पाहिलेले स्वप्न विद्यार्थी पूर्ण करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि शाळेच्या निकालाची उज्वल परंपरा कायम राखल्याबद्दल सर्व उत्तीर्ण विदयार्थी व विद्यालयाचे मुख्याध्यापक व विषय शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी नारायण कहार आणि शांताराम जोरी यांनी मनोगत व्यक्त केले.
मुख्याध्यापक डॉ.अनिल लोखंडे यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना देत संस्थेच्या माध्यमातून नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा विद्यार्थी घडावा, यासाठी मार्गदर्शन केले जाते. विविध उपक्रमाच्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी हा प्रवरेचा कसा घडेल ? यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. प्रवरा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील विद्यार्थी हे शासकीय आणि निमशासकीय सेवेसह आर्मी आणि पोलीस भरतीमध्ये प्रवरेमुळे वाढत आहे. संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच खेळालाही तेवढेच महत्त्व दिले जाते. प्रवरेतील विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे प्रशिक्षण मिळावे यासाठी चाणक्य कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच बिल्डिंग प्रवरा हा उपक्रम देखील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा ठरत आहे.
