
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
पुणतांबा — सध्या महाराष्ट्रासह देशभरात गोहत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. श्रमक्षमतेतून निवृत्त झालेल्या गायी व बैलांना रस्त्यावर सोडले जाते, जेथे त्यांची उपेक्षा, अपघात, किंवा दलालांच्या हस्ते थेट कत्तलखान्यांमध्ये जाण्याची शक्यता वाढते. ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनत असताना, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पुणतांबा शाखेने ‘गोदान’ ही समाजोपयोगी व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची मोहीम हाती घेतली आहे.मागील चार महिन्यांपासून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने यासाठी पुढाकार घेतला असून, आजवर ८० पेक्षा अधिक गायांचे प्राण वाचविले आहेत. या मोहिमेद्वारे निरुपयोगी गोवंशाला गोशाळांमध्ये सुरक्षित ठेवून त्यांचे संगोपन केले जात आहे.
हिंदू धर्मात गाईला ‘गोमाता’ मानले गेले आहे. वैदिक संस्कृतीत गाईचे स्थान अत्युच्च समजले जाते. ऋग्वेदापासून ते पुराणांपर्यंत गाईचे महत्त्व वर्णन केले गेले असून, ती केवळ उपयुक्त पशू न राहता, धार्मिक व आध्यात्मिक मूल्यांचे प्रतीक बनली आहे. श्रीकृष्णाने आपल्या बालपणी गोपालन केले आणि गाईंवर विशेष प्रेम दाखवले. त्यामुळे भक्तीच्या वाटेवर गाईला अनन्यसाधारण स्थान लाभले आहे. पंचगव्य दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय यांचा उपयोग धार्मिक विधींमध्ये, औषधोपचारांमध्ये व सेंद्रिय शेतीत केला जातो. यामुळे गाईचे सांस्कृतिक व जीवनोपयोगी महत्त्व अधिक ठळक होते. अशा पूजनीय प्राण्याची उपेक्षा ही केवळ धार्मिक दुर्लक्ष नव्हे, तर माणुसकीच्या मूल्यांचीही हानी आहे.
‘गोदान’ हे हिंदू धर्मात अत्यंत पुण्यकारक कर्म मानले जाते. प्राचीन काळात राजे-महाराजे, ऋषी-मुनि व सामान्य जनतेने गोदान करून आपली धार्मिक जबाबदारी पार पाडली. असे मानले जाते की गोदान करणाऱ्यास स्वर्गसुख प्राप्त होते आणि पूर्वजांची आत्मा तृप्त होते. हीच परंपरा आज बजरंग दलाने सामाजिक रूपात पुढे नेली आहे.ही मोहीम केवळ धार्मिकतेपुरती मर्यादित नसून तिचा थेट संबंध पर्यावरण, सेंद्रिय शेती, गोपालन संस्कृती आणि माणुसकीशी देखील आहे. गोशाळांमध्ये या जनावरांचे संगोपन करून त्यांना खाद्य, निवारा, उपचार आणि जिवंतपणाची प्रतिष्ठा दिली जाते. यामुळे ग्रामीण भागात जनजागृती होत असून, नागरिक या उपक्रमात स्वखुशीने सहभागी होत आहेत.
गोवंशाच्या रक्षणासाठी सुरू झालेली ही मोहीम आज धर्म, पर्यावरण, शेती आणि संस्कृतीचे जतन करणारा एक मोठा सामाजिक चळवळ ठरत आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी अशा गोदान मोहिमेत सहभागी व्हावे आणि गोमातेच्या रक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पुणतांबा शाखेमार्फत करण्यात आले आहे.
