
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर –1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवताना बांगलादेशच्या रणभूमीवर आलेले नगरचे सुपुत्र कॅप्टन विश्वनाथ वासुदेव तथा राजाभाऊ कुलकर्णी ज्यांना वीरमरण आले. त्यांच्या वीरपत्नी श्रीमती रेवाताई यांना भारतीय लष्कराच्या 67 मैदानी तोफखाना वीर मराठा रेजिमेंटतर्फे आज सन्मानित करण्यात आले. बांगलादेशचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची स्वाक्षरी असलेलं कृतज्ञतापत्र आणि गौरवचिन्ह यावेळी प्रदान करण्यात आले.
सावेडी रस्त्यावरील गुलमोहोर या रेवाताईंच्या निवासस्थानी दुपारी वीर मराठा मैदानी तोफखाना रेजिमेंटचे प्रमुख कर्नल शामकिशोर द्विवेदी , निवृत्त मेजर जनरल एच. एस. बेदी,मेजर नीरज पवार , लेफ्टनंट निखीलकुमार, अधिकारी संतोष काळोखे, सब आर.सी खेर्डे, गोफण, कर्नल सी. संदीप आदी आले.राजाभाऊंचे रेजिमेंटमधील अधिकारी आपल्या भेटीसाठी आलेले पाहून रेवाताई भावुक झाल्या.67 मैदानी तोफखाना वीर मराठा रेजिमेंटच्या बिकानेर (राजस्थान) येथील मुख्यालयात कॅप्टन राजाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा नुकताच उभारण्यात आला आहे. त्यासंबंधीचा माहितीपट यावेळी दाखवण्यात आला.यापूर्वी वीर मराठा रेजिमेंट पंजाब मधील फिरोजपुर येथे असताना येथील लष्करी छावणीतील एका संकुलास शहीद कॅप्टन कुलकर्णी यांचे नाव देण्यात आले होते.
रेजिमेंटचं सन्मानचिन्ह, कॅ. राजाभाऊंची प्रतिमा, या बटालियनचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, बांगलादेशनं त्यांच्या पाठवलेलं कृतज्ञता पत्र, गौरवचिन्ह, तसंच बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामात हौतात्म प्राप्त झालेल्या भारतीय अधिकारी व जवानांची अधिकृत सूची आणि माहिती, बांगलादेशाचे राष्ट्रपिता शेख मुजीबूर रहमान यांनी लिहिलेलं आत्मकथन पुस्तक रेवाताईंना यावेळी प्रदान करण्यात आले.
वीर मराठा रेजिमेंटला बांगलादेश मधील शिरामणी येथील घनघोर युद्धात कॅ. कुलकर्णी यांनी पाकिस्तानी सैन्याशी लढताना दाखविलेल्या अतुल्य शौर्यामुळे आजही शौर्य आणि समर्पणाची प्रेरणा मिळते, असे कर्नल द्विवेदी यांनी यावेळी नमूद केले.रेवाताईंनी रेजिमेंटसाठी 51 हजारांचा धनादेश दिला. स्नेहालयाच्या वाटचालीवरील ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’ हे मेधा देशमुख यांनी लिहिलेले पुस्तक यावेळी सर्व अधिकार्यांना भेट देण्यात आले.
लष्करी अधिकाऱ्यांचे स्वागत कॅ. राजाभाऊ यांचे कुटुंबीय सुषमा देवगावकर आणि डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, डॉ. वैशाली आणि डॉ. प्रभास पाटील, विनोद गुंडू, आदी उपस्थित होते.1962 सालच्या भारत चीन युद्धानंतर स्थापन झालेल्या 67 वीर मराठा रेजिमेंटमधील निवृत्त अधिकारी आणि सैनिकांचे महासंमेलनन गर मध्ये संपन्न झाले. यानिमित्ताने देशभरातील अधिकारी आणि सैनिक नगर मध्ये एकत्र आले होते
