
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी-अक्षय काळे
कोपरगाव – शहरात आणि तालुक्यात पोलिसांचा वचक कमी झालेला पहावयास मिळतो.अवैध धंदे, कुठे लूटमार, कुठे घरफोडी अशा विविध बातम्या माध्यमांतून कळत असल्या तरी पोलीस शांत का? हा मुख्य प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.यामुळे शहरात आणि तालुक्यात अवैध धंदे तेजीत चालू असल्याचे वास्तव चित्र दिसत आहे.
गावठी दारू, मटका, जुगार, कॉइन बॉक्स, गुटखा यांसारखे धंदे तेजीत चालू आहे. मात्र पोलीस यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे रोडरोमिओ,शाळा, कॉलेजच्या बाहेरील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनाही आळा घालता येत नाही. तालुक्यात व शहरात कुठे बुलेट चोरी, तर कुठे वाहतूकीची समस्या कुठे लहान मुले विना क्रमांकाच्या दुचाकी घेऊन पळताना दिसतात,अवैध धंद्यांमध्ये मटका, जुगार, गावठी दारू राजरोसपणे चालूच आहे.
गावातील नामवंत दारू दुकानांतून वेगवेगळ्या कंपनीच्या बनावट दारूची सर्रासपणे विक्री होत आहे. या सर्व परिस्थितीत प्रशासन गप्प का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. शहरात दुचाकी चोरी, दरोडा, घरफोडी, आत्महत्या किंवा घातपात याचाही पोलिसांकडून कुठलाही तपास झालेला नाही. कदाचित हीच पोलिसांची कमजोरी समजून हे अवैध धंदे सुरू असतील असे नागरिकांतून बोलले जात आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा सखोल तपास करावा, अवैध धंदे आणि बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
