
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
नेवासा – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्नेहालय उडान प्रकल्पाच्या वतीने नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा” अभियानांतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात 1300 पेक्षा जास्त विद्यार्थी 40 शिक्षक आणि गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. जावळे सर होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. प्रविण कदम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.ढेरे सर यांनी केले.
उडाण प्रकल्पाचे प्रवीण कदम यांनी विद्यार्थ्यांना बालविवाहामुळे होणारे शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक परिणाम समजावून सांगत कायद्यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच पॉक्सो कायद्याची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले.मोबाईलच्या अयोग्य वापरामुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक परिणामांवर चर्चा करत, संतुलित वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वयात येणाऱ्या मुलांनी योग्य निर्णय घेण्यासाठी काय दक्षता घ्यावी आणि शिक्षणाच्या महत्त्वावर भर देत करिअर संदर्भात योग्य दिशा दाखवण्यात आली.कार्यक्रमात पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून बालविवाहाचे दुष्परिणाम आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. स्नेहालय उडान प्रकल्पाच्या टीमने चाईल्डलाइन (1098) व स्नेहालयच्या उपक्रमांची माहिती दिली.
स्नेहालय उडान प्रकल्पाचा हा उपक्रम सामाजिक परिवर्तन घडवून आणणारा ठरला असून, उपस्थित मान्यवरांनी इतर गावांमध्येही या उपक्रमाचे आयोजन करण्याची गरज व्यक्त केली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती पठाण मॅडम यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता बालविवाहमुक्तीची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. या यशस्वी कार्यक्रमासाठी प्रविण कदम, शाहिद शेख,पूजा दहातोंडे, सीमा जुनी, आणि स्नेहालय उडान प्रकल्पाच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले असून“माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा” अभियान सामाजिक बदलासाठी क्रांतिकारी ठरत आहे.
प्राचार्य जावळे यांचे प्रतिपादन
‘स्नेहालय उडान’ प्रकल्पाने केवळ शाळेपुरता मर्यादित न राहता वाड्या-वस्त्यांपर्यंत जनजागृती पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे समाजातील अनेक कुटुंबांना नवी दिशा मिळेल,”असे प्राचार्य जावळे सर यांनी नमूद केले.
