
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी- वैभव ताजणे
आश्वी – राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यां मध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे, हे आहे. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे,क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, गलिच्छ वस्त्यांची सफाई, प्रथमोपचार,नागरी संरक्षण संगणक तसेच डिजीटल साक्षरता, इ. कार्यक्रमांचा या योजनेत समावेश असल्याचा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुष्मिता विखे पाटील यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला वाणिज्य,विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयाच्या पिंप्रीलौकी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन प्रसंगी विखे बोलत होत्या. यावेळी कँम्पस डायरेक्टर डॉ.महेश खर्डे,प्राचार्य देविदास दाभाडे,सेवानिवृत्त प्राध्यापक कान्हु गिते,अँड रोहिणी निघुते,भाऊसाहेब लांवरे, अशोक गिते,भास्कर गिते,रामदास दातीर,दादाहरी गिते, सुर्यभान गिते आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ सुष्मिता विखे पाटील म्हणाल्या की, १९७६-७७ पासून ग्रामीण विभागाची सुधारणा, तसेच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांच्या विकासाची कामे यांवर भर देण्यात आला. या दृष्टीने ग्रामीण भागातील परिसराची सुधारणा व आरोग्य तथा कुटुंबनियोजन हे कार्यक्रम हाती घेण्यात आले. त्याचप्रमाणे उत्पादनविषयक कार्यक्रम, आणीबाणी, प्रौढ शिक्षण, मनोरंजन, बालकांसाठी उपक्रम इ. कामेही सुरू करण्यात आली.
विद्यापिठ अनुदान आयोगा मार्फत सावित्रीबाई फुले विद्यापिठ पुणे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबीर राबविली जातात. ज्या संस्थेत समाजकार्य करण्याची प्रथा आहे व ज्या संस्था ग्रामीण विभागातील विकासकार्य करण्याच्या दृष्टीने ग्रामीण विभागाजवळ आहेत, अशी महाविद्यालये या योजनेसाठी निवडली जातात. प्रत्येक महाविद्यालयातून २०० पर्यंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षातून १२० तास काम करावे लागते. प्रत्येक महाविद्यालयास कार्यक्रमाची निवड करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सेवानिवृत्त प्राध्यापक कान्हु गिते यांनी सांगितले.
