
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
लोणी (ता.२९) –विद्यार्थ्यांनी आव्हानाला सामोरे जाताना अपयश हा पूर्णविराम नाही त्यातूनच आपल्याला यश प्राप्ती होत असते.ध्येयप्राप्तीसाठी आणि यश मिळवण्यासाठी संघर्ष, कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न करा यातूनच आपले जीवन हे उज्वल घडू शकते यासाठी आई-वडील आणि त्यानंतर शिक्षक हे जीवनात महत्त्वपूर्ण असतात हे कायम लक्षात ठेवा असे प्रतिपादन गुप्तचर विभागाचे अधिक्षक आणि शाळेचे माजी विद्यार्थी पंकज सोनवणे यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलचा ५९ वा वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमात पवन सोनवणे बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,संस्थेच्या अतिरिक्त मुख्यकार्यकार्यकारी अधिकारी डाॅ.सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे,संस्थेचे संचालक भाऊसाहेब ज-हाड,सौ.रोहीणी निघुते,प्रवरा भाजीपाला संस्थेच्या अध्यक्षा सौ.गिताताई थेटे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, प्राचार्य डाॅ.बी.बी.अंबाडे,प्रवरा कन्याच्या प्राचार्या सौ.भारती कुमकर,प्रवरा गर्ल्स स्कुलच्या प्राचार्या सौ.रेखा रत्नपारखी,प्रवरा सेट्रल स्कुलचे प्राचार्य विजय आहेर,कोल्हार हायस्कुलचे प्राचार्य सुधीर मोरे,पर्यक्षक के.टी.आडसुळ ,स्नेहसंमेलनाचे समन्वयक जी. एफ. मनियार आदीसह पालक विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सोनवणे म्हणाले,शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी भविष्यातील प्रत्येक संधी आणि आव्हानासाठी तयार राहावं, हा मूलमंत्र त्यांनी दिला. अभ्यासाबरोबर इतर उपक्रमातही सहभाग घेण्यास प्रेरित केले. ध्येय निश्चित करून त्या दिशेने मार्गक्रमण करण्यास सांगितले.आई-वडील आणि गुरुजनांच्या संस्काराचे महत्त्व विशद करत प्रवरेतून घडलो हा मला अभिमान आहे कारण प्रवरेच्या माध्यमातून कष्ट प्रामाणिकपणा आणि संस्कार मिळाल्यामुळेच मला हे यश प्राप्त झाले आहे जीवनात कितीही मोठे व्हा परंतु आपली शाळा आपली माणसं जपा असा संदेश देत असताना शिकत रहा शिक्षणातूनच निर्णय निर्णयक्षम विद्यार्थी हा घडत असतो आणि यासाठी प्रवरेचे शिक्षण हे महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून शाळेमध्ये झालेल्या बदल हा भावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगून प्रवरेतून मिळणाऱ्या शिक्षणातून सक्षम पिढी घडवण्याचं काम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बक्षिसातून कामासाठी प्रेरणा मिळत असते. शालेय शिक्षणातून अनुभव मिळत असतात विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्याचं काम प्रवरेच्या माध्यमातून करतांना भारतीय संस्कृती जतन करून दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना आदर्श नागरिक बनवण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. आज शहरी भागाचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवरेत मिळत असल्यामुळे आज प्रवरेचे विद्यार्थी हे सर्व गुण संपन्न होत असल्याचेही त्यांनी सांगतानाच विद्यार्थी पालक आणि शिक्षक यातूनच आदर्श युवा पिढी घडवण्याचं काम होत असून यासाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शाळेचा शैक्षणिक वर्ष २४-२५ चा अहवाल वाचन आणि प्रास्ताविक प्राचार्य डाॅ.बी.बी.अंबाडे यांनी केले. मान्यवरांच्या शुभहस्ते पहिली ते बारावी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षीचा सन्मानाचा समजला जाणारा कॉक हाऊस व वार्षिक करंडक सरदार पटेल सदनाने पटकावला. विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर यावर्षीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार वरद धरपळे व आणि आदर्श विद्यार्थिनी हा पुरस्कार कु. वेदांती मोरे यांना मिळाला. तर वस्तीगृहातील उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार हे सरदार पटेल सदन- पार्थ वळवी, तानाजी सदन – सम्राट वानखरे, नेताजी सदन – पुष्कर शिंगणे, शिवाजी सदन- पार्थ बोरुडे, तर प्राथमिक विभागातून कुंदन बहिरम या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे उपप्राचार्य के. टी. अडसूळ यांनी केले,तर सूत्रसंचालन सिमा क्षिरसागर, कविता गोरे यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पश्चिम भारत संस्कृती व परंपरा ही संकल्पना ठेवलेली होती. त्याअंतर्गत महाराष्ट्र, गोवा, गुजरात,राजस्थान येथील संस्कृती,पोशाख,सण – उत्सव,परंपरा,जीवनशैली यांचे सादरीकरण केले गेले. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध कलागुणदर्शन यांचे सादरीकरण करण्यात आले. गीत गायन, संगीत वाद्य, समूह नृत्य,नाटिका व कलाविष्कार असे विविध कलागुण पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमासाठी पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला व टाळ्यांच्या गजरात आपल्या बालगोपाळांचे विशेष कौतुक केले.
