
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
अहिल्यानगर – शिर्डीच्या साई संस्थानच्या २ कर्मचाऱ्यांची चाकूने भोसकून निघृपणे हत्या करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या. या घटनेत अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या हत्याकांडामुळे शिर्डी चांगलीच हादरली आहे.यासंबंधीच्या मिळालेल्या माहितीनुसार,सुभाष साहेबराव घोडे व नितीन कृष्णा शेजुळ अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
तर कृष्णा देहरकर असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. कृष्णावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहत. मृत कर्मचारी व जखमी तरुण सोमवारी पहाटे साई संस्थानच्या आपल्या नोकरीवर येत होते.पण रस्त्यातच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला.त्यात सुभाष व नितीन हे दोघेही जागीच ठार झाले.या दोघांवर तासाभराच्या अंतराने हल्ला करण्यात आला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे हल्ला केल्याचे कारण काय होते हे अध्यापही स्पष्ट झाले नसून या प्रकारामुळे शिर्डी पुन्हा एकदा हादरून गेली आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शिर्डी पोलिसांना तात्काळ घटनेची माहिती कळवली. पण पोलिसांनी तासभर विलंबाने घटनास्थळ गाठल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. इथे कुणीही कुणासाठी लगबगीने येत नाही, असा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला. या हत्येला अपघाताचे स्वरुप देण्यात येत असल्याचा आरोपही या प्रकरणी केला जात आहे.मृत सुभाष घोडे हे शिर्डीच्या करडोबा नगर चौकात राहत होते. त्यांच्यावर घरापासून काही अंतरावरच हल्ला करण्यात आला. तर नितीन शेजुळ व कृष्णा देहरकर यांच्यावर श्रीकृष्ण नगर भागात हल्ला झाला.
