
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव – येथील तहसील कार्यालयातील असलेल्या दुय्यम कारागृहातील १८ खतरनाक आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव नाशिक येथील कारागृहात वर्ग करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी दिली.
कोपरगाव दुय्यम कारागृहात एकूण ६२ आरोपी दाखल होते. त्यात सचिन वॉच कंपनी चोरी प्रकरणातील, काकडी येथील शेतमजूर खूनखटल्यातील, शिरसगाव येथील शिक्षक लूट प्रकरणातील, कोकमठाण येथील खून प्रकरणातील आरोपींचा समावेश होता.
एकूण चार बराकी असलेल्या कारागृहाची क्षमता केवळ वीस असताना येथे ६२ आरोपी कोंबण्यात आले होते. यातील काही खतरनाक आरोपींना हलवण्यासाठी उपकारागृह निरीक्षक, पुणे यांच्याकडे परवानगी मागण्यात आली होती.त्यानुसार आज पाच पोलीस ठाण्यांच्या पोलीस बंदोबस्तात हे अठरा आरोपी नाशिक येथे वर्ग करण्यात आले. यावेळी शहर पोलीस उपनिरीक्षक पवार व रोठे तसेच जेलर दत्तात्रय कोल्हाळ उपस्थित होते.
कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात नेहमीच आरोपींची गर्दी असते. लोणी, राहाता, शिर्डी, कोपरगाव येथील पोलीस ठाण्यातील आरोपी येथे ठेवण्यात येतात. त्यामुळे येथील कारागृह प्रशासनावर मोठा ताण पडलेला असतो. सुरक्षेचा प्रश्न नेहमी ऐरणीवर असतो. कैद्यांना दवाखान्यात नेण्या-आणण्यासाठी पोलीस यंत्रणा वापरावी लागते. हे कारागृह याआधी काही वर्षांपूर्वी दोनवेळा फोडण्याचा प्रयत्न झाला होता. येथून काही खतरनाक आरोपीही पळून गेले होते. त्यामुळे स्वतंत्र मोठे कारागृह बांधण्यात यावे म्हणून मागणी होत आहे.
