
(अहिल्यानगर खबरबात न्यूज न
नेवासा – पंचायत समिती व स्नेहालय उडान प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांसाठी विशेष बालविवाह प्रतिबंधक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत नेवासा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष खाडे, गट विकास अधिकारी संजय लखवाल आणि स्नेहालय उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना संतोष खाडे म्हणाले, “स्थानीक यंत्रणा सक्षम झाल्याशिवाय बालविवाह रोखणे कठीण आहे.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, बालविवाह हे केवळ कायदेशीर गुन्हा नसून सामाजिक विषमतेचे मूळ आहे. बालविवाहास कारणीभूत असलेल्या प्रथांवर आणि व्यावसायिक घटकांवर लक्ष केंद्रित करत, पोलिस प्रशासन आणि पंचायत समितीच्या माध्यमातून स्पष्ट सूचना आणि कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
“मी स्वतः बीड जिल्ह्यातील असून बालविवाहाचे परिणाम अनुभवले आहेत. ऊसतोड मजुराच्या कुटुंबातील असल्याने या समस्येचे मूळ माहीत आहे,” असे सांगत त्यांनी बालविवाहामुळे उध्वस्त होणाऱ्या मुलींच्या आयुष्याची व्यथा मांडली. त्यांनी पुढे नमूद केले की, विवाहात मदत करणारा, आयोजन करणारा, तसेच जेवण करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई होते.
या कार्यशाळेत स्नेहालय उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी ‘उडान’ व ‘मुक्ती वाहिनी’ या प्रकल्पांची सविस्तर माहिती देत, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालविवाह रोखण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया, आणि पुनर्वसनासाठी आवश्यक असलेली बाल कल्याण समितीची भूमिका समजावून सांगितली.
तसेच ग्राम बाल संरक्षण समित्या, स्थानिक यंत्रणांशी समन्वय, आणि कायद्यानुसार पोलिस आणि पंचायत यांच्यातील भूमिका कशा असाव्यात यावरही सखोल माहिती देण्यात आली. ‘माझं गाव बालविवाहमुक्त गाव’ आणि ‘माझी शाळा बालविवाहमुक्त शाळा’ या दोन मोहिमांची संकल्पना मांडत, या उपक्रमांना ग्रामपंचायत स्तरावर राबवण्याचे आवाहनही करण्यात आले.
शेवटी, गट विकास अधिकारी संजय लखवाल यांनी संपूर्ण प्रशिक्षणाचा सारांश सादर करत स्नेहालय व पोलिस प्रशासनाचे आभार मानले. “2027 पर्यंत नेवासा तालुका बालविवाहमुक्त करण्यासाठी पंचायत समिती स्नेहालयसोबत पूर्ण सहकार्य करेल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या यशस्वी कार्यशाळेसाठी स्नेहालय उडान प्रकल्पाचे सोशल वर्कर पूजा दहातोंडे, शाहिद शेख, सीमा जुनी, हॉस्पिटलचे प्रमुख मनोज देशपांडे, साजन शेंडे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक प्रवीण कदम यांनी केले, तर आयोजनाची संपूर्ण जबाबदारी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडली.
