
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – राहाता तालुक्यातील चितळी परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची सोमवारी, दि. 29 सप्टेंबर रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आणि नागरिकांच्या घरांमध्ये जाऊन नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला.चितळी परिसरातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राहाता तालुक्यातील अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका, ऊस यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेले असल्याने पुढील पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे ठरणार आहे. दिवाळीच्या तोंडावर आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे.

मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांचे सांत्वन करत सरसकट आर्थिक मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले आणि महसूलच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट सूचना करत चितळी परिसरातील अतिवृष्टीग्रस्त शेतांची पाहणी करून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली असून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे,सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन पूर्ण प्रयत्न करीत असून कोणताही शेतकरी किंवा नागरिक मदतीशिवाय सोडला जाणार नाही, असेही ना. विखे पाटलांनी सांगितले.

यावेळी अँड अशोकराव वाघ, सुजय दादा विखे पाटील, मित्र मंडळाचे अध्यक्ष शैलेश वाघ, सरपंच नारायणराव कदम, सोना पगारे, रेवणनाथ वाघ,अशोक वाघ,मंजीनाथ वाघ, अण्णा वाणी, अमर सुरुडे, बाळासाहेब मुंगी, नानासाहेब वाघ, जीवन वाघ, शिवाजी वाघ, सोपान वाघ, सागर कातोरे,शुभम तनपुरे, बाळासाहेब वाणी, नानासाहेब वाघ, लखन काकडे,विलास वाघ आदींसह चितळी परिसरातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.





