
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील रामपूरवाडी – वाकडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून,सर्व रस्तेच चिखलमय होवून खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने तळ्यांचे स्वरूप आले आहे.यामुळे नागरिकांना प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रामपूरवाडीचे सरपंच संदीप सुरडकर यांनी थेट गांधीगिरीचा अवलंब केला.त्यांनी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवला.

सरपंच सुरडकर म्हणाले की,“कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघात तब्बल तीन हजार कोटींची विकासकामे झाल्याचा दावा केला आहे.मात्र ग्रामीण भागात प्रत्यक्षात कामे झाले नाही.फक्त फ्लेक्सबाजी सुरू आहे.लेखाशीर्ष 25-15-12-38 अंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील 52 रस्ते व सीडी वर्कसाठी राज्य शासनाकडून तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी आमदार काळे यांनी मंजूर करून आणला.तरीही रामपूरवाडी जवळील पुलाचा सीडी वर्क अद्याप झालेला नाही.”त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून,पुलांसह रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण न झाल्यास प्रशासन व लोकप्रतिनिधीं विरोधात उपोषण करण्याचा इशाराही सुरडकर यांनी दिला आहे.
कोपरगाव मतदारसंघातील रामपूरवाडी–वाकडी–पुणतांबा (७–८ कि.मी.) पुलांचे काम, वाकडी–एलमवाडी–पुणतांबा (७–८ कि.मी.), पुणतांबा–नापावाडी (६–७ कि.मी.), वाकडी–जळगाव (५–६ कि.मी.), वाकडी–धनगरवाडी (३–४ कि.मी.), तसेच वाकडी ठमके वस्ती–रामपूरवाडी फाटा (४–५ कि.मी.) यांसह या मार्गांवरील विविध पुलांचे कामे अद्यापही प्रलंबित आहेत.याशिवाय अनेक गावांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते देखील पूर्णत्वाला गेलेले नाहीत.गेली अनेक वर्षेपासुन नागरिक खराब रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित उपविभाग तसेच आमदारांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे,” असा गंभीर आरोप सरपंच सुरडकर यांनी केला.




