
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील चितळी ग्रामपंचायतीची ग्रामसभा बुधवार, (दि.२१) ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयाच्या नजीक असलेल्या कर्मयोगी शिवाजीराव परशराम वाघ पाटील मंगल कार्यालयात पार पडणार असून याबाबतची माहिती चितळी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम यांनी दिली आहे.
या सभेत मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करण्यासह ग्रामपंचायत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प, तसेच टि.बी. मुक्त ग्रामपंचायत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी यावर चर्चा केली जाणार आहे. याचबरोबर, वृक्षलागवड कार्यक्रम-२०२५ यशस्वी करण्यासाठी संरक्षण व पाण्याच्या व्यवस्थेबाबत ठोस निर्णय घेण्यात येणार आहेत.
ग्रामसभेत नागरिकांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ द्वारे उपलब्ध असलेल्या ३० शासकीय विभागांच्या एकूण ५९२ सेवांची माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर घनकचरा विलगीकरण व सांडपाणी व्यवस्थापन याबाबत विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जाईल. तसेच, विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट संदर्भात नागरिकांचे अभिप्राय नोंदवले जाणार आहेत.
याशिवाय, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, अपूर्ण व सुरु नसलेली घरकुले, सार्वजनिक साठवण तलावात मासे सोडणे, रोजगार हमी योजनांचा आराखडा, तसेच कृषी, महसूल, अंगणवाडी, शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, आरोग्य उपकेंद्र, वीज वितरण, पाटबंधारे विभाग आदी महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे. यामधून गावाच्या विकासाचा ठोस रोडमॅप तयार होण्याची अपेक्षा आहे.
सरपंच नारायणराव कदम यांनी चितळी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना या ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच शासकीय परिपत्रकानुसार वेळोवेळी येणारे विषयही सभेत चर्चेस घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामसभेत घेतलेले निर्णय ग्रामविकासासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




