
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील पिंपळवाडी परिसरातील वाकचौरे वस्तीवर काल (दि. ३० जुलै) सकाळी ११ वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ही वस्ती शेतीच्या मध्यभागी असून अनेक कुटुंबे थेट शेतवस्तीवर राहत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार,काल आकाश पवार यांच्या घरी असलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.परंतु, त्यांच्या वडिलांनी योग्य वेळी सावधगिरी बाळगल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे संपूर्ण वस्तीमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने बहुतांश नागरिक दिवसभर शेतांमध्ये काम करत असून काहीजण रात्रीच्या वेळीही शेतीसाठी शेतात जातात.त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याचा संभाव्य धोका मोठ्या प्रमाणावर जाणवतो आहे. पाळीव प्राणी, महिलावर्ग आणि लहान मुलांच्या सुरक्षेची चिंता अधिकच वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर वाकचौरे वस्तीतील नागरिकांनी कोपरगाव वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. बिबट्याचा वावर अधूनमधून होत असल्याचे अनेकांनी नमूद केले असून, वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.
कोपरगाव वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी अरुण वाकचौरे, संदीप तुरकणे, शुभम तुरकणे, विकी वाकचौरे, सचिन मुजमुले, अशोक वाकचौरे, आकाश पवार, ललित धरम, हर्षद वाकचौरे, सागर खरात, संजय धरम, ज्ञानेश्वर धरम, आदित्य रहाणे आणि अनिल वाकचौरे आदींनी केली आहे.
स्थानिकांची मागणी:
“शेतीमध्ये काम करणाऱ्या सर्व कुटुंबांची सुरक्षितता ही प्राथमिकता आहे. वन विभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अन्यथा एखादा दुर्दैवी प्रकार घडल्याशिवाय लक्ष घेतले जाणार नाही का?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला आहे.




