
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव – घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची…आई गृहिणी, वडील रोजंदारीवर गोदावरी दूध संघात काम करणारे… संसारवेलीवर उमललेली तीन कन्यारत्नं आणि एक मुलगा. मात्र नियतीने गंभीर थॅलेसेमिया या रक्तविका राच्या रूपाने थेट त्यांच्या आनंदावर घाला घातला. या दाम्पत्यातील दोन मुलींना आणि एकुलत्या एक मुलाला थॅलेसेमिया झाला. त्यातील मुलगा सुयश केवळ आठ महिन्यांपूर्वीच या दुर्धर आजारामुळे मृत्यूमुखी पडला.
शिंगणापूर (ता. कोपरगाव) येथील सौ. मैनाबाई व जालिंदर कुऱ्हे हे रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्या मुली सुवर्णा (वय 14, शिक्षण नववीपर्यंत पूर्ण) व वैष्णवी (वय 7, दुसरीत शिकते) या दोघी शिंगणापूरच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र, त्या दोघींनाही थॅलेसेमिया हा रक्तविकार असून महिन्यातून दोनदा त्यांना रक्तबदल करणे गरजेचे असते.
या उपचारांसाठी आई-वडील सतत कष्ट करत असून मुलींचं आयुष्य वाचवण्यासाठी दिवस-रात्र झगडत आहेत. उपचारासाठी त्यांनी लोणी, प्रवरानगर, अहिल्या नगर येथील सिव्हिल रुग्णालयात वारंवार ने-आण केली आहे. सध्या दोघींनाही कोपरगावातील बालरोगतज्ज्ञ डॉ. आतिष काळे यांच्या देखरेखीखाली उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रत्येक वेळी रक्त बदलाच्या प्रक्रियेसाठी अंदाजे 1500 ते 2000 रुपयांचा खर्च येतो. रक्तदात्यांच्या मदतीने रक्त मिळते, परंतु आर्थिक खर्च पेलणे हे या गरीब कुटुंबासाठी मोठे आव्हान ठरत आहे.या लढ्यात त्यांना मदतीचा हात देणारे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भवर, अमोल कटके, चंद्रशेखर मस्के व त्यांचा ‘रक्तदाता ग्रुप’ नेहमी सक्रिय असतो. तरीही आर्थिक साहाय्याची नितांत गरज आहे.
थॅलेसेमियासारख्या आजाराविषयी जनजागृतीसाठी ८ मे रोजी ‘जागतिक थॅलेसेमिया दिन’ साजरा केला जातो. अशा दुर्धर आजाराशी लढा देणाऱ्या सुवर्णा व वैष्णवी यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या कुटुंबाच्या हक्काच्या स्वप्नांसाठी सामाजिक दातृत्वाची गरज आहे.सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भवर (मो. ७५८८०२१९११) व वडील जालिंदर कुऱ्हे (मो. ९३७३३०३२७१) यांनी केले आहे.
