
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – अहिल्यानगर जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान तातडीने त्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.
मागील वर्षी शेतकरी संघटना व दुध उत्पादक शेतकरी बांधव यांच्या वतीने दूध दरवाढीसाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत दुग्धविकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ३/५ फॅट व ८/५ एसएनएफ दूधसाठी प्रती लिटर ३० रुपये दर व ५ रुपये अनुदान जाहीर करत परिपत्रक जारी केले होते.
थोड्या काळासाठी अनुदान मिळाले, मात्र मागील काही महिन्यांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुक्यांतील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही. दरम्यान, पशुखाद्य, चारा, व इंधनाचे दर प्रचंड वाढले असून, शेतमालालाही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
विठ्ठलराव शेळके यांनी स्पष्ट सांगितले की, “दूध उत्पादनाचा खर्च लक्षात घेता किमान ४० रुपये प्रती लिटर दर जाहीर करावा किंवा थकीत अनुदान तातडीने वितरित करावे. अन्यथा, हा प्रश्न घेऊन शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन उभारनार असल्याचे त्यांनी सांगितले.
