
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील वाकडी-धनगरवाडी-दिघी रोड परिसरातील शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या शेतात (६ मे) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास बिबट्या अडकला ही माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली.परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येण्यास विलंब केला. संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याला वाकडी ग्रामपंचायत घेऊन जात वनखात्याचा निषेध व्यक्त केला.यापूर्वीही एप्रिल महिन्यात याच परिसरात ३ बिबटे जेरबंद झाले होते.

वाकडी-धनगरवाडी-दिघी रोड परिसरातील स्थानिक नागरिकांनी वनखात्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांना अनेकदा सूचित करूनही वनविभागाचे कर्मचारी वेळेवर घटनास्थळी दाखल झाले नाही.यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकच ओरड करून वनविभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीचा तीव्र निषेध व्यक्त केला.
वनखात्याचे कर्मचारी येत नसल्याचे पाहून शेवटी संतप्त ग्रामस्थांचा संयम सुटला त्यांनी शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या शेतात जेरबंद झालेल्या बिबट्याचा पिंजरा घेऊन वाकडी (ता.राहता) ग्रामपंचायतीत दाखल झाले.त्यानंतर काही वेळेत वनरक्षक पि.डी गजेवार श्रीरामपूर तालुका वनपाल विठ्ठल सानप ग्रामपंचायतीत दाखल झाले कर्मचाऱ्यांकडून घटनास्थळी उशिरा पोहोचण्याचे कारण लेखी स्वरूपात लिहून घेतले.अधिकाऱ्यांनाही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जात लेखी निवेदन लिहून द्यावे लागले यावेळी दुपारी १२ वाजता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेतले.असून बिबट्याचे वय अंदाजे अडीच वर्ष असल्याचे सांगितले जात आहे.चितळी धनगरवाडी परिसरामध्ये आता पर्यंत दोन चिमुकल्यांचे बळी गेलेले असतानाही वनविभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

यावेळी ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे यांना दिलेल्या निवेदनात वाकडी-धनगरवाडी परिसरात कायमस्वरूपी वनरक्षक नेमण्याची मागणी केली आहे, तसेच यापुढे अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने अधिक तत्परतेने कार्यवाही करावी,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.वनविभागाने परिसरात अंदाजे तीन ते चार पिंजरे लावले आहेत,ज्यामध्ये कोंबड्या अथवा शेळ्या भक्ष म्हणून ठेवले जात आहेत, स्थानिक शेतकरी बाळासाहेब शेळके हेच हे भक्ष्य ठेवण्यासाठी सहकार्य करत आहेत यामुळे बिबट्यांना पकडण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.

दिवसेंदिवस चितळी- वाकडी -धनगरवाडी- दिघी रोड परिसरात बिबट्यांचा उच्छाद वाढत आहे. स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत.नागरिक व पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याच्या घटनांनी नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण केली आहे.ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यप्रणालीवर असमाधान व रोष वक्त केला आहे स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

त्या निवेदनात त्यांनी बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची व परिसरातील सर्व बिबट्यांचा नायनाट करण्यासाठी किंवा त्यांना जेरबंद करण्यासाठी कायमस्वरूपी वनाधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी शेतकरी बाळासाहेब शेळके,विजय शेळके, महेश जाधव, प्रमोद येलम, अण्णासाहेब कोते, धनंजय शेळके, राहुल शेळके, निलेश लहारे, ऋषिकेश शेळके, यश शेळके, भारत येलम, सुनील शेळके, चांगदेव शेळके आदींसह वाकडी धनगरवाडी चितळी परिसरातील समस्त नागरिकांनी वनखात्याकडे केली आहे.




