
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
पुणतांबे – जय बाबाजी भक्त परिवाराच्या सुमारे दीड हजार महिला आणि पुरूष भक्तांनी येथे पुरातन मंदिरे व घाट दुरुस्तीसाठी राबवलेल्या एकदिवसीय महाश्रमदान शिबिरामुळे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या श्रीक्षेत्र पुणतांबेचे रुपडे पूर्णपणे बदलले आहे. बदललेला परिसर पाहून भाविकांत समाधान व्यक्त होत आहे. राज्याची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबे येथील गोदावरी नदीकाठी वसले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुमारे चारशे वर्षांपूर्वी बांधलेला सुंदर घाट व अडीचशे पुरातन मंदिरासह बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर येथे आहेत. अनेक मंदिरांची पडझड झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी येथील दोन मंदिरातील मूर्तीच्या विटंबना प्रकरणानंतर जगदुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांनी येथे भेट दिली. पडझड झालेल्या मंदिरांची दुरुस्ती सर्वांच्या सहकार्यातून करण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती.
श्रमदानापूर्वी पूजा..!
- रविवारी पहाटे शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन महाश्रमदान या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यामध्ये नाशिक, जालना, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर येथून सुमारे दीड हजार महिला व पुरूष भाविकांसह असंख्य कारागीर यामध्ये सहभागी झाले होते. गोदावरी नदी काठावरील दोन्ही घाट व दहा-बारा मंदिराची दुरुस्ती यावेळी करण्यात आली. या मोहिमेत पुणतांबेकरांनी मोठे योगदान दिले. या एकदिवसीय महाश्रमदान शिबिरामुळे दक्षिण काशीतील मंदिरांनी कात टाकली असून सर्व मंदिरांचे रूपडे पूर्णपणे बदलले आहे. मंदिरे आकर्षक झाली असून, यामुळे भाविकांसह नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. एकजुटीने राबवलेल्या मोहिमेतून किती बदल होऊ शकतो, दक्षिण काशीचे बदललेले स्वरूप पाहून लक्षात येते. या मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
गावाचाही कायापालट करणार..!
- जय बाबाजी भक्त परिवाराने ही महाश्रमदान मोहीम सुरू केली. सुरू झालेली ही मोहीम पुढील काळातही सुरू ठेवण्यात येणार आहे. मंदिरांसह गावाचा कायापालट सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून केला जाणारा असल्याचे मंदिर स्वच्छता सेवा अभियान समितीच्या सदस्यांनी सांगितले.
भग्नमूर्ती, मंदिराचे कळसही बदलणार..!
- पुणतांबा येथील मंदिर दुरुस्तीच्या मोहिमेला काल सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात काही मंदिरातील भग्न झालेल्या मूर्ती व कळस बदलण्यात येणार आहे. तसेच गोदावरी नदी पवित्र व स्वच्छ ठेवण्यासाठी गटारीचे पाणी नदीत सोडू नये, कपडे नदीमध्ये धूवू नये, असे आवाहन करण्यात आले. यासाठी ग्रामपंचायतने स्वतंत्र व्यवस्था करावी. ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन शांतिगिरी महाराज यांनी केले. यावेळी नागेश्वर महाराज उपस्थित होते.
