
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
रुईछत्तीशी – स्नेहालयचा उडान प्रकल्प हा एक सामाजिक उपक्रम असून, बालविवाह प्रतिबंध, जनजागृती, पुनर्वसन तसेच बालकांचे हक्क व अधिकार यासाठी कार्यरत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गाव व शाळांमध्ये बालविवाहविरोधात जनजागृती केली जाते. याशिवाय, बालकांचे आरोग्य, शिक्षण आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी कौशल्यविकासावर विशेष भर दिला जातो.
या प्रकल्पांतर्गत ‘बालविवाहमुक्त गाव अभियान’ राबवले जात असून, सामाजिक, शैक्षणिक व प्रशासनिक पातळीवर काम करत गावांना बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रेरित केले जाते. यासाठी ग्रामस्तरीय सर्वेक्षण, जनजागृती मोहिमा तसेच प्रशासनाच्या सहकार्याने विविध कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात.याच अभियानांतर्गत नगर तालुक्यातील रुईछत्तीसी हे गाव जिल्ह्यातील पहिले बालविवाहमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत या गावात एकही बालविवाह झालेला नाही, ही विशेष बाब असून, उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी गावाचे मन:पूर्वक अभिनंदन केले.गावात बालकांचे सर्वेक्षण, जनजागृती मोहिमा व संरक्षण उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या. ग्रामपंचायत, बाल संरक्षण समिती, अंगणवाडी सेविका आणि स्थानिक यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, बाल संरक्षण समिती, अंगणवाडी सेविका, शिक्षक व ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नातून रुईछत्तीसीने खालील सर्व निकष पूर्ण केले:
- ग्रामसभेचा ठराव – बालविवाह रोखण्याचा ठराव पारित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी.ग्रामस्तरीय बाल संरक्षण समितीची स्थापना व सक्रिय कार्य.१८ वर्षांखालील मुली व २१ वर्षांखालील मुलांचे सर्व विवाह रोखण्यात यश.मागील पाच वर्षांत गावात एकही बालविवाह न झाल्याची नोंद.विवाहप्रसंगी वधू-वरांचे वय तपासून लेखी प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया.शाळाबाह्य मुलांचा पुन्हा शिक्षणात समावेश.गावस्तरावर जनजागृती व कौशल्यविकास उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी.
- स्नेहालय संस्थेचे संचालक हनीफ शेख यांनी “माझे गाव बालविवाहमुक्त गाव” ही संकल्पना स्पष्ट करताना स्नेहालयच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की,“स्नेहालय उडान प्रकल्पामार्फत २०२७ पर्यंत अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या अनुषंगाने ‘माझे गाव बालविवाहमुक्त गाव’ आणि ‘माझी शाळा बालविवाहमुक्त शाळा’ ही दोन प्रमुख मोहिमा राबवली जात आहेत. रुईछत्तीसी या गावाचे विशेष कौतुक वाटते कारण मागील पाच वर्षांत एकही बालविवाहाची घटना घडलेली नाही. आपण सर्वांनी ठरवलेले निकष पूर्ण केलेत आणि या गौरवासाठी पात्र ठरलात. यासाठी स्नेहालय कडून आपले मन:पूर्वक अभिनंदन. यापुढेही जर कोणत्याही बालकाला अडचण असेल, तर तात्काळ उडान हेल्पलाइनशी संपर्क साधावा.”उडान प्रकल्पाच्या मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी सांगताना स्पष्ट केले:“कोणत्याही विवाहात सहभागी होण्यापूर्वी वधूचे वय किमान १८ व वराचे २१ वर्षे पूर्ण झाले आहे की नाही, याची खात्री करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा आपण गुन्हेगार ठरू शकता.”
ग्रामसेवक मोहन प्रभुणे यांनी आपला अनुभव मांडताना सांगितले:
“मागील पाच वर्षांपासून मी उडान प्रकल्पासोबत काम करत आहे. अनेक गावांमध्ये बालविवाहाच्या घटनांवर कारवाई केली आहे. मात्र, रुईछत्तीसीमध्ये गावाने स्वतः पुढाकार घेऊन बालविवाह रोखले, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.”त्यांनी पुढे सांगितले की ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष, बाल संरक्षण समिती आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाले.कार्यक्रमात सरपंच विलास लोखंडे, उपसरपंच आशा वाळके, अंगणवाडी सेविका सोनू राऊत, वैशाली भामरे, मीना पवार, अनिता गोरे, संगीता गोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- भविष्यासाठी प्रेरणा आणि आवाहन
- हा कार्यक्रम केवळ एक सन्मान नव्हे, तर इतर गावांसाठी प्रेरणादायी पथदर्शक आहे. यावेळी स्नेहालय-उडान प्रकल्पातर्फे इतर गावांना आवाहन करण्यात आले की,“रुईछत्तीसीच्या उदाहरणातून प्रेरणा घ्या. आपलेही गाव बालविवाहमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्या, सर्व निकष पूर्ण करा आणि बालविवाहमुक्त गाव म्हणून गौरव मिळवा.”
- या अभियानाला स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी आणि विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या प्रेरणेखाली नगर तालुक्यात ‘माझे गाव बालविवाहमुक्त गाव’ हे अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे.या अभियानामागे झपाटून काम करणारे उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम, समुपदेशक प्रियंका मते, सामाजिक कार्यकर्ते शाहिद शेख, पूजा दहातोंडे, शशिकांत शिंदे, सीमा जुनी आणि उडानचे समर्पित स्वयंसेवक यांचे कार्य अत्यंत स्तुत्य आहे.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी केले.आभार ग्रामसेवक मोहन प्रभुणे यांनी मानले.
