
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांना बजावलेल्या जप्ती नोटीसीवर स्वाक्षरी करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात शेळके यांनी नमूद केले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, केंद्र आणि राज्य सरकारने शेतमाल निर्यातीवर घातलेली बंदी, आणि उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत.
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत ते आश्वासन पूर्ण झालेले नाही. याविरोधात शेतकरी संघटनेमार्फत राज्यभर आंदोलन सुरु आहे. दोन महिन्यांपूर्वी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर रघुनाथदादा पाटील आणि शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजितदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन झाले होते.
शेळके यांनी आरोप केला की, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही, सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नोटीस बजावून कर्जपुर्नगठनेच्या नावाखाली फसविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. नाशिक जिल्ह्यात जसे शेतकऱ्यांवर जप्ती मोहिमा राबवण्यात आल्या, तशाच योजना इथेही राबविल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंनी या नोटीसीवर स्वाक्षरी करू नये आणि या अन्यायाला विरोध करावा, असे आवाहन शेळके यांनी केले. तसेच शेतकरी संघटना कर्जमुक्ती मिळेपर्यंत शांत बसणार नसून, यासाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
