
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी- शंकर सोनावणे
लोणी – कलियुगात भगवे वस्त्र धारण केलेले अनेक दिसतील मात्र अंतःकरण शुद्ध नसेल तर ते अर्थशून्य असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार ह.भ.प स्नेहगंगा शृंगारे यांनी केले.दरम्यान लोणी बुद्रुक येथे संत तुकाराम बिजोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिव महापुरान कथेला भाविकांनी पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद दिला.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थ लोणी बुद्रुक यांच्या वतीने १० ते १७ मार्च या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ पारायण व शिव महापुरान कथा सोहळ्याचा सोमवारी उत्साहात आरंभ झाला.लोणी भूषण हभप भारत महाराज धावणे यांच्या नेतृत्वाखाली शेगावचे संत गजानन महाराज यांच्या गजानन विजय ग्रंथाच्या पारायनासाठी वाचकांनी मोठा सहभाग नोंदवल्याने ग्रंथाची कमतरता निर्माण झाली.आयोजकांनी परिसरातील नागरिकांना त्यांच्याकडील ग्रंथ पारायनासाठी देण्याचे आवाहन करताच अनेक नागरिकांनी ग्रंथ आणून दिले.
बिजोत्सचनिमित रात्रौ ८ ते ११ वेळेत अमरावती येथील प्रसिद्ध कथाकार हभप स्नेहगंगा श्रीजी शृंगारे यांच्या अमृत वाणीतून आयोजित केलेल्या शिव महापुरान कथेला परिसरातील भाविकांनी पहिल्याच दिवशी मोठी उपस्थिती दर्शवली.जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनीही कथा श्रवणाचा आनंद घेतला. यावेळी बोलताना हभप स्नेहगंगा श्रुंगारे यांनी आपल्या परखड आणि अभ्यासपूर्ण वाणीतून श्रोतु वर्गाला मार्गदर्शन करताना सांगितले की,सनातन हिंदू धर्मात ३३ कोटी देव सांगितले आहेत.अज्ञानी लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावत संख्यात्मक केला.मात्र तो प्रकारात्मक आहे.हिंदू धर्मात ३३ प्रकारच्या देव-देवता सांगितल्या आहेत.त्यापैकी पाच प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात असतात.यासर्व देवतांमध्ये शिव हे अग्रस्थानी आहेत.ज्याच्या शरीरातून शिव निघून गेला त्याचे शव शिल्लक रहाते. शरीराला ताप आला आला तर भोजन घ्यावे वाटत नाही.भोजन शरीराला ऊर्जा देते ते भजन मनाला ऊर्जा देते.मनाची ऊर्जा महत्वाची आहे.पापी माणसाच्या मुखात भगवंताचे नाम येत नाही.ते येण्यासाठी गर्भातूनच संस्कार व्हावे लागतात.काही लोक आजच्या पिढीला दोष देतात मात्र दोषी आपण आहोत.संस्कार करण्यात आपण कमी पडल्याचा तो दृश्य परिणाम आहे.
त्या पुढे म्हणाल्या की,संकट काळात चार गोष्टीची तपासणी होते.संयम,धर्म,स्त्री आणि मित्र हे संकटात आपली साथ सोडतअसतात.नातेवाईक,कुटुंबीय,मित्र,स्नेही हे संसाराच्या मायाजाळातून जोडलेले असतात.करोना सारख्या महामारीत आपलं या जगात कुणीच नाही हे सर्वांनी बघितलं आहे.संसारातून बाहेर पडा आणि देवाची सोबत करा.संत नामदेव महाराजांनी १३ व्या शतकात लिहिलेल्या अभंगात साधू थोर जाणा कलियुगी असे सांगितले.कलियुगात भगव्या वेशात अनेक साधू दिसतील मात्र त्यातील खरा साधू ओळखावा लागेल असे सांगताना त्यांची लक्षणे सांगितली आहेत.भगव्या वेशा बरोबरच अंतःकरण शुद्ध असावे लागते.भगवा रंग त्यागाचे प्रतीक आहे.जो त्यागी असतो त्याचे अंतःकरण शुद्ध होते.देवाला हेच आवडते असे त्यांनी शेवटी सांगितले.
