
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता- राहाता तालुक्यातील वाकडी येथे काल रात्री एक वाजेच्या सुमारास वनविभागाच्या पिंजर्यात बिबट्या जेरबंद झाला.तर त्यासोबत असलेला दुसरा बिबट्या मात्र;वाकडी परिसरात मानवीवस्तीत अजुनही मोकाट फिरत असून यामुळे संपूर्ण वाकडी परिसरातील नागरीक अजूनही बिबट्याच्या दहशतीच्या सावटाखाली आले असून सकाळी किंवा दुपारी शेतात जाण्यास नागरिकांची हिम्मत होत नसून. परिसरात भक्षाच्या शोधात फिरत असलेल्या बिबटयाला जेरबंद करावे अशी मागणी वाकडी ग्रामस्थांनी केली आहे.
वाकडी परिसरात मागील अनेक महिन्यापासून बिबट्यांनी उच्छाद मांडला आहे. दोन बिबट्यांनी वाकडी परिसरातील अनेक कुत्री, शेळ्या, कालवडी फस्त केल्या आहेत. वाकडीतील वाकडी सोसायटी नंबर एकचे संचालक दत्तात्रय मारुती पोटे यांचे आठ दिवसात एक पाळीव कुत्री व एक कुत्रा फस्त केला. पोटे यांच्या वस्ती च्या दोन्ही बाजुंनी ओढे तसेच झाडांंचे प्रमाण जास्त असल्याने लपन्यास भरपूर हिरवेगार शेत असल्याने बिबट्यांचे वास्तव्य त्या भागात आहे. तसेच त्यांना दिवसाही बिबट्याचे दर्शन होत होते. त्यामुळे त्यांनी वनविभाग व ग्रामपंचायतीचे सरपंच यांना या प्रकाराची माहिती देवून पिंजरा देण्याची मागणी केली. बिबट्याचा वावर पाहता वनविभागाने दत्तात्रय पोटे व अमोल लहारे यांच्या बांधाजवळ पिंजरा लावला.
पोटे यांना ७. ३० ते ८ वाजण्याच्या सुमारास दोन बिबटे दिसुन आले. ते पिंजर्या जवळ गिरट्या घालतानाही त्यांना बॅटरीच्या उजेडात दिसले. त्यातील एक बिबट्या पिंजर्यात शिरला व जेरबंद झाला. तर दुसरा तेथून पसार झाला. बिबट्या जेरबंद होताच याची कल्पना वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे वनरक्षक प्रतिक गजेवार व सुरासे यांनी पिंजर्यात अडकलेल्या बिबट्याला त्यांच्याजवळील पिंजर्यात स्थानांतरीत केले. मात्र पहिला लावलेला पिंजरा ग्रामस्थांच्या आग्रहामुळे त्या मोकाट बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावला. सदर बिबट्या चार वर्षाचा असुन तो नर जातीचा होता. त्यास वनविभागाने नैसर्गिक अदिवासात सोडण्यात आले.वाकडी परिसरातील बिबटे पिंजरे लावून तात्काळ जेरबंद करावेत,अशी मागणी वाकडीच्या सरपंच रोहिणी आहेर व गणेशचे संचालक विष्णुपंत शेळके यांनी केली आहे.
