
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – सर्वांना बरोबर घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. हे स्वराज्य टिकवण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांवर आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी शासना बरोबरच प्रवरा शैक्षणिक संकुलाचा विद्यार्थी देखील शासनाच्या समवेत पुढाकार घेऊन गडकिल्यावर जयंती सोहळा करणार असल्याचा मानस लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी व्यक्त केला.
लोकनेते पद्मभूषण डॉ . बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषि शास्त्र महाविद्यालयात आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्यात डाॅ. सुष्मिता विखे पाटील बोलत होत्या. यावेळी प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप महाले , कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . निलेश दळे , कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आशिष क्षिरसागर , अन्नतंत्रज्ञान महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. चंद्रकला सोनवणे तसेच सर्व विद्यार्थी व कर्मचारी देखील उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांचे ढोल – ताशा पथकाने पारंपारिक स्वागत करत , विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गडाचे स्वराज्याचे प्रतिक म्हणून गडपूजन करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थी आश्विन काकुळते , वैष्णवी शिंदे आणि बाल चिमुकली कु. मोनिका गायकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य शालेय पातळीवर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून गड किल्ल्यांची ओळख, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्यांचे संवर्धन आपल्याला करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गडकिल्ल्याच्या संवर्धनाचे काम शासनाच्या माध्यमातून सुरू असले तरी, शासनाला मदत म्हणून प्रवरा संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी एका गड किल्ल्याची स्वच्छता ही संस्थेच्या विद्यार्थ्यां मार्फत करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत असे डाॅ.विखे पाटील यांनी सांगितले.या उपक्रमातून गडाची सविस्तर ओळख विद्यार्थ्यांना होईल. यासाठी शासनाने प्रवरा संस्थेला गड किल्ले सफाईसाठी परवानगी द्यावी म्हणून प्रयत्न सुरू केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरवर्षी शिवजयंतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विविध उपक्रमातून पोहोचवण्याचं काम प्रवरेतून होत आहे. गडकोट संवर्धन , शिवचरित्राची गरज,पारंपारिक शिवजयंतीचे महत्त्व त्यांनी विषद केले.
यावेळी डॉ . उत्तमराव कदम यांनी शिवरायांचे गुणकौशल्य आजच्या पिढीने त्यांचाकडून घ्यावयाचा आदर्श या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर नलवडे व कु. आदिती कोरडे यांनी केले तर डॉ .रमेश जाधव यांनी आभार मानले.
