
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोळपेवाडी – कोपरगांव शहरासह संपूर्ण मतदारसंघात आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अखंड हिंदुस्थांनाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवार (दि.१९) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आ.आशुतोष काळे यांनी सर्व शिव भक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजासह भारत देश वासियांचे ऊर्जा स्त्रोत असून शिवजयंती केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर महाराष्ट्राच्या ऐतिहासिक शौर्याची गौरवगाथा आजच्या पिढीला सांगण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र करून सर्वाना स्वराज्यात समान वागणूक दिली.परस्त्रीला माते समान दर्जा दिला. रयतेचा राजा कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून जनतेच्या वेदना समजून घेवून त्या प्राधान्याने सोडविणाऱ्या त्यांच्या आदर्श विचारांची जपणूक करून त्या विचारांवर वाटचाल करणे आपले कर्तव्य असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
यावेळी समस्त शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष केला. त्यावेळी जयघोषाने स्मारकाचा परिसर दुमदुमून गेला होता.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक,कार्यकर्ते, नागरिक यावेळी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
