
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
प्रतिनिधी-अक्षय काळे
कोपरगाव शहर- श्रीरामपूर-संगमनेर तालुक्यात अतिक्रमण विरोधात मोहीम राबविल्या नंतर आता कोपरगाव शहरात अतिक्रमणविरोधी मोहिम राबवण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे.कोपरगाव शहरातील वाढणारे अतिक्रमणे आणि नागरिकांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोहिम सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
यादरम्यान कोपरगाव शहरात आज मंगळवारी (दि. ४) रोजी दिवसभर अतिक्रमण हटाव मोहिमे अंतर्गत नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक रचनाकार अश्विनी पिंगळ, रचना सहाय्यक किरण जोशी, रश्मी प्रधान,प्रभारी आरोग्य निरीक्षक बापू हरणे,राजू तुझारे,मनोज लोट यांच्यासह कोपरगाव नगरपरिषदेचे अनेक कर्मचारी फौज फाट्यासह कोपरगाव शहरातील अतिक्रमित भागात दाखल झाले. यावेळी अतिक्रमण झालेल्या ठिकाणी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रीतसर मोजमाप करण्यात आले आहे त्या ठिकाणी खुणा करून लाल निशान करण्यात आले आहे.
कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून मिळालेल्या माहिती नुसार संबंधित मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य रस्ते,फूटपाथ,सार्वजनिक जागेवर केलेल्या अतिक्रमणांमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होवूनयामुळे पायदळी चालणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास होतो.शहराच्या मुख्य ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे शहराचा श्वास कोंडला असल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे कुठेतरी अतिक्रमण संपूष्टात येणे गरजेचे असून नागरिकांकडून नगरपरिषदेला प्राप्त झालेल्या अनेक तक्रारीमुळे कोपरगाव नगरपरिषद ऍक्शन मोडवर आली आहे यामुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दाणाणले आहे.
या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील अतिक्रमणास लगाम घालण्यासाठी नगरपरिषदेच्या प्रशासनामार्फत सदरचे अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.ज्या भागात अतिक्रमण केले आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना आगाऊ सूचना देवून नगर परिषदेमार्फत नोटीस बजावली जाणार आहे.त्यानंतर पुढील कारवाईस सुरुवात केली जाणार आहे.या मोहिमेत पुढे जावून नेमके कश्या पद्धतीने कारवाई होणार? यामुळे कोपरगाव शहरातील अतिक्रमण हटणार का? या गोष्टी कडे शहरातील सर्वच नागरिकांचे व व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
