
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
कोपरगाव शहर – अक्षय काळे
कोपरगाव – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवीन तंत्रज्ञान अवगत करुन भविष्यातील वाटचालीचा वेध घ्यावा. या मिळालेल्या नव्या क्षितीजाच्या संधीचे सोनं करावे.असे आवाहन तहसिलदार महेश सावंत यांनी केले आहे.
रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज महविद्यालय, कोपरगांव, दि बाॅम्बे मदर्स अॅन्ड चिल्ड्रेन वेल्फेअर सोसायटी, राजगुरुनगर, सूर्यतेज संस्था, कोपरगांव यांचे वतीने उच्च माध्यमिक शिक्षण घेणा-या अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती चे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांचेसाठी ए. आय. आणि रोबोटिक या विषयावर तीन दिवसीय विशेष प्रशिक्षणाचे आयोजन कोपरगांव येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज महविद्यालयात करण्यात आले होते.यावेळी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारोह कोपरगांवचे तहसिलदार महेश सावंत यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. दि बाॅम्बे मदर्स अॅन्ड चिल्ड्रन वेलफेअर सोसायटीचे सचिव डॉ.माधव साठे,शर्मिला सांडभोर, श्री.स.ग.म.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता समारोहाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. मोहनराव सांगळे होते. तसेच सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, उपप्राचार्य संजय शिंदे, प्रशिक्षक प्रा. सागर खोडदे, प्रा. पिनाक रुबारी ,कार्यशाळा अधिकारी एकनाथ कळमकर,सूर्यतेजच्या वर्षा जाधव आदींसह महाविद्यालय शिक्षक, शिक्षिका आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी तहसिलदार श्री. सावंत पुढे म्हणाले, आजची पिढी जेवढी स्मार्ट तेवढी आळशी होत आहे.विकसित तंत्रज्ञानाने गुन्हेगारी वाढत नसून ठराविक गुन्हेगारी मानसिकता असेलेले असे कृत्य करत असतात. यात मानवी मानसिकतेचा दोष आहे. तंत्रज्ञानाचे फायदे घ्या. असे सांगत, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रगल्भ विचाराने ज्ञानयज्ञात झोकून देत महान कार्य केले असल्याचे गौरव उद्गार काढले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उप प्राचार्य डॉ. मोहनराव सांगळे म्हणाले, विद्यार्थींनी आपली आंतरिक शक्ती ओळखली पाहिजे.अवगत तंत्रज्ञान हे नोकरीच्या केवळ दृष्टीने न बघता ज्ञानाच्या दृष्टीने पहावे. अडथळ्यावर मात करित मोठ्या जिद्दीने शिकले पाहिजे. असे सांगितले.
तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत स.ग.म.महाविद्यालय, के.जे.सोमैय्या महाविद्यालय, विद्या प्रबोधिनी शाळा या संस्थेतील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतला. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निग, कॉम्प्युटर व्हिजन डीप लर्निग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, रोबोटिक्स, सेन्सर्स या विषयी माहिती आणि साहित्य द्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या प्रसंगी प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनी स्नेहल कांबळे, गणेश सोळसे , प्रबुद्ध भातकुडव यांनी प्रशिक्षणातुन अवगत माहिती विषद केली. तर अवनी सोनवणे हीने सेन्सर सह विविध माहिती प्रात्यक्षिक सह सादर केली. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि समुह साहित्य पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले.उपस्थितांचे स्वागत उपप्राचार्य संजय शिंदे यांनी कार्यशाळेची माहिती प्रा. सागर खोडदे यांनी विषद केली. तर आभार कार्यशाळा अधिकारी प्रा. एकनाथ कळमकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता अत्रे यांनी केले. कार्यशाळेत ग्रामीण भागातील सहभागी विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना ए. आय.आणि रोबोटिक चे प्रशिक्षणातुन कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निग, कॉम्प्युटर व्हिजन डीप लर्निग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, रोबोटिक्स, सेन्सर्स चे प्राथमिक ज्ञान मिळाल्याने त्यांचे पालकांनी समाधान व्यक्त केले.
