सामाजिकस्नेहालय संस्था अहिल्यानगर

स्नेहालय संस्थेच्या कलाम बालभवन, सखी वन स्टॉप सेंटर आणि उडान प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रमातून बालविवाह प्रतिबंध आणि महिला सक्षमीकरणाला मिळाली नवी दिशा!

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

अहिल्यानगर – हळदी कुंकू हा पारंपरिक कार्यक्रम महिलांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. हा कार्यक्रम केवळ सण-उत्सवापुरता मर्यादित नसून महिलांना एकत्र येऊन संवाद साधण्याचे, त्यांच्या समस्या समजून घेण्याचे आणि त्यावर उपाय शोधण्याचे प्रभावी साधन आहे. अशा उपक्रमांद्वारे महिलांना सामूहिक शक्तीची जाणीव होऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो.

 

याच उद्देशाने स्नेहालय संस्थेच्या कलाम बालभवन, सखी वन स्टॉप सेंटर आणि उडान प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगरमधील सिद्धार्थनगर येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून महिलांना बालविवाह प्रतिबंध, महिलांचे सक्षमीकरण, कौटुंबिक हिंसाचारविरोधी उपाय, आणि कौशल्यविकास याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

जाहिरात

 

महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे विशेष महत्त्व असते हळदी कुंकू कार्यक्रम महिलांना एकत्र आणण्यासाठी, संवाद प्रस्थापित करण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करतो. महिलांमधील सामाजिक बांधिलकी मजबूत करत, त्यांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांद्वारे सकारात्मक बदल घडवले जातात.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक शबाना शेख यांनी “बेटी बचाव, बेटी पढाव” मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी महिलांना सखी वन स्टॉप सेंटरद्वारे कौटुंबिक हिंसाचार, परित्यक्ता महिलांचे प्रश्न, आणि त्यासाठी उपलब्ध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

 

उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे महत्त्व सांगत, बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम स्पष्ट केले. त्यांनी पालकांनी मुलींच्या शिक्षण, आरोग्य, आणि भावी आयुष्याबाबत जबाबदार भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. “बालविवाहामुळे मुलींच्या भविष्याचा ऱ्हास होतो. त्यामुळे पालकांनी योग्य निर्णय घेऊन त्यांच्या आयुष्याला दिशा द्यावी,” असे ते म्हणाले.

जाहिरात

उमेद प्रकल्पाच्या व्यवस्थापिका यास्मिन शेख यांनी महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी महिलांना कौशल्यविकास कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आर्थिक स्वावलंबी होण्याचा सल्ला दिला.कार्यक्रमाचा समारोप प्रतीक्षा साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्यायाविरोधी प्रतिज्ञा घेत करण्यात आला.

 

सामाजिक एकजूट आणि परिवर्तनाची दिशा मिळाली असून या उपक्रमाने महिलांना बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, आणि आर्थिक सक्षमीकरणाबाबत ठोस भूमिका घेण्याची प्रेरणा दिली. उपस्थित महिलांनी या कार्यक्रमातून स्फूर्ती घेऊन आपल्या कुटुंबांसाठी आणि समाजासाठी सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार केला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित चारुलता कस्तुरी, बालभवनचे समुपदेशक रूबिना शेख उपस्थित होत्या.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा वेडेपल्ली यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप भोसले यांनी मानले. वैशाली नेटके, छाया जगधने, मनीषा चकाले, आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.स्नेहालयच्या या उपक्रमाने महिलांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करत, त्यांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा दिली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!