
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
चितळी- “बालविवाह हा फक्त गैरकायदेशीर नाही, तर बालकांच्या आयुष्याचे मुळ उखडून टाकणारा गंभीर सामाजिक अपराध आहे. याला समर्थन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षेस पात्र ठरवले जाईल,” असे ठाम प्रतिपादन उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ लोणी,संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पुणतांबा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे जळगाव (ता. राहाता ) येथे दि 15 जानेवारी ते 21 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात दि.18 जानेवारी रोजी दुपारी 3.वा “बालविवाहाची समस्या आणि आजच्या तरुणाईची भूमिका” या विषयावर स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रविण कदम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाच्या सर्वप्रथम सावित्रीबाई फुले,लोकनेते पद्मविभूषण डॉ.विठ्ठलराव विखे पाटील,पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील,प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संस्थापिका स्वर्गीय सिंधुताई विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संचलित लोणी, कला,वाणिज्य,व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.सुरेश शिंदे,प्रा. बाबासाहेब म्हसे, प्रा.नंदू सदाफळ ,प्रा.शामा धनवटे,प्रा. तेजस्विनी पवार,प्रा. सीमा झोजे,प्रा. माधुरी मोकळ, पोपट पगारे, आदी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी स्नेहालय संस्था व उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम पुढे बोलताना म्हणाले की,शिक्षेस पात्र असणाऱ्यांमध्ये वधू-वरांचे आई-वडील नातेवाईक व मित्रमंडळी,शेजारी व गावकरी पुरोहित किंवा लग्न लावणारे व्यक्ती,लग्न मंडप चालक व सजावट व्यवस्थापक,डिजे व्यवस्थापक आणि संगीत सेवा पुरवणारे,मंगल कार्यालय चालक घटनेला सहकार्य करणारे इतर कोणतेही घटक आदी दोषी ठरतील.बालविवाह प्रतिबंधक कायद्याची सविस्तर माहिती देत स्पष्ट केले की, कोणत्याही प्रकारच्या सहभागामुळे संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई होईल. बालविवाह थांबवण्यासाठी नागरिकांनी सजग राहणे गरजेचे असून, बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा स्नेहालय उडान प्रकल्पाच्या हेल्पलाईनवर द्यावी. यावेळी माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या अनुषंगाने बालविवाह व्यवस्थेचा विरोध करावा आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबाला बालविवाहाचे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक परिणाम समजावून सांगण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी असेही सांगितले की, “समाज जागृतीचा केंद्रबिंदू बनून तरुणाईने समाज सुधारणेसाठी पुढाकार घ्यायला हवा या हेतूने उडाण प्रकल्पाने मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात उडान प्रकल्पाचे स्वयंसेवक प्रशांत खाटेकर आणि रुपेश अनाप यांनी जागृती चळवळीतील प्रेरणादायी चळवळीचे गीते सादर केली. त्यांच्या संगीताने स्वयंसेवकांमध्ये सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणा निर्माण झाली.स्थानिक पातळीवर जागृती मोहीम राबविण्यात आली.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुरेश शिंदे यांनी पंचक्रोशीतील गावांमध्ये बालविवाहविरोधी जागृती अभियान राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
स्नेहालयाच्या प्रकल्पांचे प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी स्वयंसेवकांना संस्थेला भेट देण्याचे नियोजन जाहीर केले.उपस्थित ७० स्वयंसेवक व शिक्षकांना बालविवाह थांबवण्यासाठी सजगता व समाजातील सकारात्मक बदल घडवण्य साठी प्रेरित केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी बालविवाहमुक्त गावांचा संकल्प केला.बालविवाह थांबवण्यासाठी सजग होणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या समाज विघातक कृत्याला थांबवण्यासाठी सतर्कतेने प्रयत्न केले जावेत असा ध्यास राखण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गौरी गरुड, प्रास्तविक प्रा नंदू सदाफळ,, तर आभार प्रा.शामा धनवटे यांनी मानले.
