
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
राहाता -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री साईबाबा महाविद्यालय, शिर्डी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी’ या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे पिंपळवाडी गावात 9 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान भव्य आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात युवकांना सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणा देणाऱ्या विविध सत्रांचे नियोजन केले गेले. त्यात 13 जानेवारी रोजी स्नेहालयच्या उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. प्रविण कदम यांनी आयोजित केलेले जागृती सत्र युवकांसाठी नवी ऊर्जा आणि दृष्टीकोन घेऊन आले.
श्री.प्रविण कदम यांनी सत्रामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा, पॉक्सो कायदा, बालकांचे हक्क, सोशल मीडियाचा परिणाम, आणि युवकांच्या समस्यांवरील उपाययोजना यावर सखोल चर्चा केली. त्यांनी बालविवाहामुळे समाजाला होणारे दुष्परिणाम स्पष्ट करत, युवकांनी याविरोधात उभे राहून भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन केले. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर कसा करता येईल, यावरही त्यांनी विशेष भर दिला.सत्रात युवकांनी आपल्या समस्या मांडल्या, ज्याला श्री. कदम यांनी समाधानकारक उत्तरे देत त्यांना योग्य दिशा दिली. चर्चेमुळे युवकांमध्ये समाजासाठी योगदान देण्याची तळमळ जागृत झाली.
श्री.प्रवीण कदम यांनी स्नेहालय संस्थेच्या कार्याचा परिचय देत, बालकांच्या आणि महिलांच्या हक्कांसाठी संस्थेने केलेल्या अथक प्रयत्नांवर प्रकाश टाकला. त्यांनी उपस्थितांना संस्थेला भेट देऊन कार्य जवळून अनुभवण्याचे निमंत्रण दिले. उपस्थितांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि त्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा निर्धार केला.
सत्राचे आयोजन आणि व्यवस्थापन उडान प्रकल्पाच्या स्वयंसेवकांनी केले. प्रशांत खाटेकर, अनिकेत बेलेकर आणि प्रसाद चौधरी यांनी सत्र यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे नेतृत्व प्राचार्य डॉ. संतोष औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. प्रा. राजेंद्र काळे, डॉ. पंचफुला बोडके, प्रा. शिवनाथ तक्ते, डॉ. बाळासाहेब औताडे, डॉ. शितल धरम, डॉ. श्रेयस पानसंबळ, प्रा. सागर ठोसर आणि प्रा. नामदेव मोरे यांनी शिबिराचे यशस्वी आयोजन केले.
युवकांमध्ये नवा दृष्टिकोन..!
या जागृती सत्राने युवकांमध्ये सामाजिक समस्यांविषयी जागरूकता निर्माण केली आणि सामाजिक परिवर्तनासाठी उभे राहण्याची प्रेरणा दिली.
