(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
अहिल्यानगर:- (ता.२५) – मानवी तस्करी हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गुन्हा आहे आणि यापासून तरुण मुली आणि महिलांना संरक्षण मिळवण्यासाठी योग्य खबरदारी घेतली पाहिजे. त्यांनी युवतींना सावध राहण्याची आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत संपर्क साधताना किंवा माहिती शेअर करताना काळजी घेण्याची सूचना दिली. पिडीत महिलांनी स्वतःचे संरक्षण केले पाहिजे. मानसिक दृष्ट्या सक्षम होवून समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे आवश्यक आहे. कोणतीही भीती न बाळगता अत्याचारीतांना शिक्षा देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कोणत्याही संकटाशी सामना करणे महत्वाचे आहे. लैंगिक अत्याचारित पीडितांना शासनाकडून मनोधैर्य योजनेमार्फत किमान ३ ते १० लाख रुपये देण्याची तरतूद केली आहे. या प्रकरणांच्या पुनर्वसनासाठी एक समिती नेमण्यात आली आहे, ज्यामध्ये सत्र न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, आणि पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे. यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. लैंगिक अत्याचारित पीडितांना शासकीय योजना देण्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कटीबद्द आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले.
लैंगिक अत्याचारित पिडीतांसाठी स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाने कायदेविषयक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर बाल कल्याण समितीचे सदस्या अँड. अनुराधा येवले, स्नेहाधार प्रकल्पाचे मानद संचालक अँड. श्याम असावा, स्नेहालयाचे संचालक प्रविण मुत्याल, सहसंचालक संजय चाबुकस्वार, श्रद्धा काळे, कायदेविषयक सल्लागार अँड.अमोल डोंगरे, अँड. दीपक धीवर आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, मुलींनी आकर्षणाला बळी पडू नये. आकर्षनामुळे लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत जात आहे. आपण कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेत अँड. श्याम असावा यांनी स्नेहाधार प्रकल्पाबाबत माहिती प्रकल्प कोणकोणत्या सेवा सुविधा देतो याबद्दल परिचय करून दिला. पीडितांना निवारा, भोजन, समुदेशन, कायदेविषयक मार्गदर्शन, औषधोपचार आणि वेळप्रसंगी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. तसेच मनोधैर्य योजना मिळवून दिली जाते. जास्तीत जास्त पिडीतांनी आपले कागदपत्रे स्नेहाधार प्रकल्पात जमा करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका कोंगळे यांनी केले उपस्थितांचे आभार प्रविण कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या घोरपडे, निखील चुटे, पुष्पा चौधरी, श्वेता कंदी, रुपाली सोयम, रुपाली पारिसे, यश पानपाटील, मंदाकिनी मोकळे, कोमल मोकळे, अमर पाटील, पल्लवी भिंगारदिवे, कावेरी रोह्कले. स्वप्नील मोकळ,श्याम चव्हाण, अशोक अकोलकर, राजेंद्र शिंदे, राहुल लवांडे आणि संदीप खरात आदींनी परिश्रम घेतले.
