
अहिल्यानगर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीला आले होते तेव्हा मी त्यांच्यासोबत अशोक खरात याच्याकडे गेलो होतो. त्यावेळी दीपक केसरकर यांनी आग्रह केला, त्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो. काही गोष्टी अज्ञानातून घडल्या, असे वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. एकनाथ शिंदे यांना अशोक खरातबाबत काहीच माहिती नव्हती. ते मला म्हणाले की, एके ठिकाणी जायचे आहे. अशोक खरातबाबत माहिती असती तर ते तिकडे गेले असते का? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. ते बुधवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अशोक खरात प्रकरणात आम्ही पहिला गुन्हा दाखल केला म्हणून हे प्रकरण उघडकीस आले. अनेक महिला अशोक खरातच्या वलयाला बळी पडल्या. अंजली दमानिया यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबतचे सत्य चौकशीत समोर येईल. अनेकांचे पाय धुताना फोटो आहेत, भाषण करताना नावं आलेली आहेत. आपल्या भागातील माणूस देवाचा अवतार आहे, असे समजून शिर्डीतील काही लोक बळी पडले. पण यासाठी लोकांना दोष देऊ नये, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले.
समता पतसंस्था प्रकरणात जबाब नोंदवले गेले आहेत. अशोक खरात स्वतः अकाउंट उघडायचा आणि ऑपरेट करायचा. अनेक महिलांना फसवण्यात आले. अज्ञानाने घडलेल्या गोष्टी आणि माहिती असून जाणे, यामध्ये फरक आहे. इथून पुढे कोणी भविष्य सांगायला आलं, तर आधी त्याचं भविष्य बघावं लागेल. अंजली दमानिया यांच्याकडे भरपूर माहिती असेल. रोज नवीन प्रकार समोर येत आहेत. जे दोषी असतील, ते मोठ्या पदावर असतील तरी कारवाई झाली पाहिजे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.




