
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपलेल्या व संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून आदेश देण्यात आले आहे.जिल्हा परिषद नगर अंतर्गत राहाता पंचायत समितीच्या अधिपत्याखाली असणाऱ्या तब्बल २५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ दि. ८ फेब्रुवारी पर्यंत संपुष्टात येत आहे.त्यानुसार या ग्रामपंचायतीवर प्रशासकराज लागू होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या असून ग्रामपंचायतींच्या निवडणुका याकाळात होणे शक्य नसल्याने.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषद प्रशासनाने या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज लागू करण्याचे आदेश नुकतेच पारित केले आहेत.दि.९ फेब्रुवारी २०२१ रोजी गठीत झालेल्या राहाता तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ दि. ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीपर्यंत पूर्ण होत आहे.त्यानुसार प्रशासकराज लागू होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये आडगाव बु., अस्तगाव, बाभळेश्वर, भगवतीपूर, चंद्रपूर, एकरूखे, गोगलगाव, हनुमंतगाव, हसणापूर, जळगाव, केलवड बु.,कोल्हार बु.,लोणी बु.,लोणी खु.,ममदापूर, नांदूर, पाथरे बु.,पिंपळवाडी, पिंपरी लोकाई, रामपूरवाडी, रांजनगाव खु., सावळीविहीर खु.,शिंगवे, तिसगाव, वाळकी, यावर्षी कार्यकाळ संपणाऱ्या २५ ग्रामपंचायतींची समिती राहाता यांनी प्रसिद्ध केली आहे.तसेच पिंपळस येथे २०२४ पासुन प्रशासकराज लागू आहे.आणि उर्वरित ग्रामपंचायत वर प्रशासकाची नियुक्ती होणार आहे.या सर्व ग्रामपंचायती तालुक्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहे.
राहाता तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींचा कारभार अंदाजे सहा महिने अथवा वर्षभरासाठी गावाला विश्वासात घेऊन ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासना कडुन चालवला जाणार असून, पुढील निवडणूक प्रक्रिया जाहीर होईपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाल्या शिवाय तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका वेळेत पार पडणार नाही.त्यामुळे ठराविक वेळेत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्यस्थितीमध्ये विलंबाने होणार असल्याचे चित्र आहे.
प्रशासकराजामुळे इच्छुकांची हिरमोड..!
जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुका वेळेत जाहीर न झाल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका रखडल्या असून तालुक्यातील अनेक गावातील ग्रामपंचायतीवर प्रथमच प्रशासकराज येत आहे.यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीत असलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांची मोठी निराशा झाली आहे.ग्रामपंचायतींच्या निवडणुका नेमक्या कधी होणार,प्रशासकराज एकदा लागू झाल्यानंतर तो नेमका कधी संपणार,ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम निश्चित वेळेत जाहीर होईल का?असे अनेक प्रश्न भावी उमेदवारांना पडले आहेत.
प्रशासकराज म्हणजे काय?
ग्रामपंचायतीचा निवडून आलेला कार्यकाळ संपल्यानंतर तेथे कुठलाही लोकनियुक्त प्रतिनिधी नसतो.निवडणूक ठरलेल्या वेळेत न झाल्यास त्या ग्रामपंचायतीचा कारभार शासनाकडून नियुक्त प्रशासकाकडे दिला जातो. या कालावधीत विकासकामे, शासकीय योजना, कर वसुली तसेच गावपातळीवरील प्रशासकीय निर्णय प्रशासकांच्या माध्यमातून घेतले जातात.
ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन व अहिल्यानगर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त आदेशानुसार पंचायत समिती राहाता यांच्या माध्यमातून यावर्षी २५ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज लागू करण्यात येणार आहे. या कालावधीत ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज, विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी, कर वसुली तसेच गावपातळीवरील प्रशासकीय निर्णय नियुक्त प्रशासकांच्या नियमानुसार करण्यात येतील.शासनाकडून पुढील निवडणूक प्रक्रिया जाहीर होईपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार आहे.
–विवेक गुंड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती राहाता




