
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – संगमनेर अंतर्गत राहाता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीन असलेल्या राहाता-चितळी मार्गावरील रामपूरवाडी फाटा ते नेहे वस्तीपर्यंतचे रस्तेकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले दिसते.शासनाकडून कोट्यावधीच्या निधीची तरतूद होऊन पण रस्त्याचे काम कासव गतीने चालू आहे.अपूर्ण कामामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.संपूर्ण रस्त्यावर अक्षरशः धुळीचे साम्राज्य झाल्याने प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहे.नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर हा रस्ता पूर्ण होणार का? असे प्रश्न आता सर्वसामान्यांच्या तोंडी आहेत.लोकप्रतिनिधी-अधिकारी ‘व्यस्त’ ठेकेदार ‘मस्त’ मात्र ‘सर्वसामान्य जनता झाली ‘त्रस्त’ अशीच परिस्थिती उद्भवलेली दिसत आहे.
रामपूरवाडी फाटा ते नेहे वस्तीपर्यंत रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे प्रवासी नागरिकांची मान–पाठ एक होत आहे.दररोज शेकडो वाहने या मार्गावरून जात असताना ठिकठिकाणी खड्डे पडल्याने दुचाकी स्लिप होऊन लहानमोठे अपघातही घडत आहेत.कारखान्याची उसाची वाहतूकही येथून सुरु आहे.रस्त्याची खरडपट्टी झाली आहे.सदर रस्त्यावर अणावाधाने अपघात होऊन कोणास अपंगत्व आल्यास गंभीर इजा झाल्यावर खासदार,आमदार किंवा मंत्री बांधकाम विभाग प्रशासन जागे होतील का?म्हणुन याप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
दीड महिन्यांपूर्वी ठमकेवस्ती ते नेहे वस्ती या अंदाजे एक किलोमीटर भागातील रस्त्याचे काम ठेकेदाराने सुरु केले होते नेहे वस्ती ते ठमकेवस्ती या भागात झालेल्या कामात डांबराचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट दिसते.रस्त्याची लेव्हलही विसंगत असल्याने लाखो रुपये खर्च करूनही काम दर्जाहीन होत असल्याची नागरिकांत चर्चा आहे.खडी-डांबराचे प्रमाण कमी, साहित्याचा निकृष्ट वापर आणि ढिसाळ कामामुळे या रस्त्याची अवस्था काही दिवसांत पुन्हा जैसे थे होईल.त्यामुळे एमडीआर-11 या मुख्य रस्त्याचे पूर्ण काम नेमके कधी होणार याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.मात्र शासनाने मंजूर केलेल्या निधीची अशा प्रकारे उधळण होत असल्याबद्दलही सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.संगमनेर अंतर्गत राहाता सार्वजनिक बांधकाम विभाग “काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे” असे उत्तर देवून शांत बसल्याचा आरोपही जनतेकडून होत आहे.नेमलेला ठेकदार निकृष्ट दर्जाचे कामं करत असून या कासवगती कामामुळे प्रवासी नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत.रस्त्याच्या स्थितीबाबत विचारणा केली असता कोणतेही ठोस उत्तर न मिळाल्याने निष्क्रिय लोकप्रतिनिधी सांगकामे ठेकेदार आणि संबंधित सार्वजनिक बांधकामं विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात नाराजी वाढत आहे.
तात्पुरत्या उपाययोजना;निधीची ‘हेराफेरी’
राहाता–चितळी मार्गावरील ठमकेवस्ती ते रामपूरवाडी फाटा हा रस्ता अनेक वर्षांपासून खड्डेमय अवस्थेत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळोवेळी फक्त खडी डांबराची मलमपट्टी करून तात्पुरता तोडगा काढला जातो;रस्त्यांचे कामं व्यवस्थित व्हावे म्हणून शासन कोट्यावधीचा निधी मंजूर करते मात्र कामं त्या दर्जाचे होत नाही.चांगल्या कामाची विलग्नना होते.समक्ष निकृष्ट कामं होते निधीची ‘हेराफेरी’ करून विल्हेवाट लावली जाते.त्यामुळे काहीच दिवसांत पुन्हा रस्ता खड्डे पडून पूर्ववत होतो.एवढे सगळे करूनही रस्त्याची अवस्था सुधारत नाही,सर्वसामान्य जनता रोज खड्डेमय रस्त्याने त्रास सहन करत प्रवास करीत असली तर एसीत बसणाऱ्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना याचे घेणं देणं नाही.लोकसभा विधानसभा निवडणुकीत सर्वात आधी मत मागायला येणारे ‘नेते’ निवडून आल्यावर रस्त्यांच्या प्रश्नावर बोलताना दिसत नाही.




