
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव – अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रवंदे सारख्या ग्रामीण भागातील उमेश राजाराम सरडे या तरुणाची भारतीय सैन्यात नुकतीच निवड झाली आहे.यामुळे रवंदे गावात आनंद आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे. देशसेवेच्या दिशेने उमेशने टाकलेले हे मोठे पाऊल अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
उमेश सरडे नेहमी राष्ट्रीय विद्यार्थी सेना (एनसीसी) मध्ये सक्रिय सहभाग घेत असे. त्याने विविध शिबिरे, संचलन आणि उपक्रमांमध्ये नेहमी पुढे राहत स्वतःमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सैनिकाला आवश्यक असलेले गुण विकसित केले.
सध्या उमेश के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव येथे तृतीय वर्ष बी.एस्सी (भौतिकशास्त्र) शिकत आहे. शिक्षणासोबतच सैन्य भरतीची तयारी, घरची जबाबदारी आणि प्रशिक्षण यांचा समतोल राखत उमेशने मेहनतीच्या बळावर हे यश मिळवले.उमेशची निवड झाल्याचे समजताच रवंदे गावात आणि कोपरगाव तालुक्यात उत्साहाची लाट उमटली.महाविद्यालयातील प्राध्यापक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच एनसीसी अधिकारी यांनी उमेशचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.




